
Devendra Fadnavis – Amit Shah Meeting in Delhi: दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अचानक दिल्ली दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरुन राज्यात सुरु असलेल्या घडामोडींचाही संदर्भ असेस.
सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना आता आपली राज्यसभेची जागा सोडावी लागणार आहे. त्यामुळे त्या रिक्त जागेवर कोणाला पाठवायचं यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांची सुनेत्रा पवारांशी चर्चा झाली आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस अमित शाह यांना माहिती देतील अशी सूत्रांची माहिती आहे.
तसंच यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यात राष्ट्वादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भातही चर्चा केली जाईल. याशिवाय सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा लवकरच पार पडणार आहे. या दौऱ्यासंदर्भात अमित शाह यांनी माहिती दिली जाणार आहे. राज्यात सद्या काय स्थिती याची सविस्तर माहिती अमित शाह यांच्यासमोर मांडली जाईल.
दरम्यान राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून, यामध्ये भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीतील भाजपा आणि महायुतीच्या कामगिरीबद्दल माहिती दिली जाईल.
चंद्रशेखर बावनकुळेंनी फेटाळले दावे
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र देवेंद्र फडणवीस राजकीय भेटीसाठी गेल्याचे दावे फेटाळून लावले आहेत. “देवेंद्र फडणवीस सरकारचा येणारा अर्थसंकल्प, केंद्रातून जी मदत मिळाली आहे त्याअनुषंगाने दिल्लीला गेले असतील. प्रत्येक वेळी मुख्यमंत्री दिल्लीला राजकीय चर्चासाठी जात नसतात. विकासकामाचा चर्चेसाठी सुद्धा दिल्लीला जावं लागतं. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अमित शाह यांच्या सदिच्छा भेटीसाठी जाणार असतील,” असं ते म्हणाले आहेत.
जिल्हा परिषदेतही भाजपा सर्वात मोठा पक्ष
विधानसभा, महापालिका आणि नगरपालिकांच्या पाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 12 जिल्हा परिषदांपैकी 6 जिल्ह्यांमध्ये भाजपाला बहुमत मिळालं आहे. भाजपानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. शिवसेना शिंदे गट तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भाजपाने 731 पैकी 225, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 165, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 162 जागा जिंकल्या असून, महायुतीने आपलं प्राबल्य दाखवलं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 43, काँग्रेसला 55, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 26 जागांवर विजय मिळाला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



