
Shashikant Shinde on NCP Alliance: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. विलिनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धूरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय शरद पवारांसह सर्व नेत्यांनी केला होता असं त्यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांनी शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवार यांना समर्पीत करण्यात आलेल्या मासिकाच्या अध्यक्षीय लेखात हा दावा केला आहे. याचाच अर्थ शरदचंद्र पवार यांचा पक्ष राष्ट्रवादीत विलिन करण्यास शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचे ठरले होते असा दावा अध्यक्षीय लेखात करण्यात आला आहे.
लेखात काय लिहिलं आहे?
“12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करण्याचा निर्णय माननीय पवार साहेबांच्या उपस्थितीत झाला होता, विलीनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादांकडे सुपूर्त करण्याचा निर्णयही साहेबांसह सर्व नेत्यांनी केला होता. कार्यकर्त्यांची तर तीच इच्छा व अपेक्षा होती. त्यासाठी ते आग्रही होते. पण मध्येच काळाने झडप घातली आणि दादांचे दोन्ही पक्ष एकत्र करण्याचे स्वप्न अपुरे राहिले. आता आपली सर्वांची जबाबदारी हे दोन्ही पक्ष एक करण्याची आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले मन मोठे करून प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रवादीचे विलीनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

“अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोट्यानाट्या षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे. परंतु झालेली चुक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचाराने दादा मागील चार-पाच महिन्यांपासून कामाला लागले होते. दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण करायचे असा निर्धार करून ते पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. जयंत पाटील, मा. पवार साहेब आणि आमच्याशी बोलत होते. महानगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती घडवून आणली होती आणि स्वतः हिरीरीने प्रचाराची आघाडी सांभाळीत होते,” असंही त्यांनी सांगितलं आहे.
त्यांचा हेतू योग्य दिसत नाही – सूरज चव्हाण
“अजित पवारांचं नेतृत्व आधीही त्यांच्या पक्षातील सर्व नेत्यांना मान्य होतं. पण काही लोक ज्यांच्या इच्छा होत्या, त्यामुळे मतभेद निर्माण झाले होते. पण त्यांच्याही अनेकांना अजित पवारांचं नेतृत्व मान्य होतं. पण त्या विलिनीकरणासंदर्भात काय निर्णय झाला, काय ठरलं होतं, दादा आणि त्यांच्यात काय चर्चा झाली होती? यावर आता बोलण्यापेक्षा वर्तमान आणि भविष्यात काय करता येईल यावर चर्चा झाल्या पाहिजेत,” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सांगितलं आहे.
“सुनेत्रा पवार आता आमच्या पक्षाच्या सर्वेसर्वा आहेत. त्यांच्यासोबत जर चर्चा करायची असेल तर ते करु शकतात. पण ज्याप्रकारे ते चर्चेला समोर येत आहेत, त्यावरुन त्यांचा हेतू योग्य दिसत नाही. त्या हेतूवर आम्हाला शंका येते. कारण विलिनीकरणाच्या चर्चा माध्यमात होत नसतात,” असंही त्यांनी सांगितलं.
“आता काही लोक सत्तेसाठी अजित पवारांचं नेतृत्व मान्य करत होते, तर काहीजण सत्ता नसतानाही मान्य करत होते. आज अजित पवार हयतीत नाहीत आणि पार्थिव विद्या प्रतिष्ठानात असताना विलिनीकरणाच्या चर्चा करत होते त्यांचा हेतू कुठेही शुद्ध वाटत नाही. फक्त सत्तेसाठी विलिनीकरणाचा हेतू दिसत आहे”, असा आरोप त्यांनी केला आहे.
“आमच्याकडून कधीही विलिनीकरणाच्या विषयावर चर्चा झाली नाही. जे काही चर्चा झाल्या, अजित पवारांच्या बैठका हे सगळे खुलासे त्यांच्याकडून होत होते. आमची प्राथमिकता अजित पवारांच्या कुटुंबाच्या, पक्षाच्या मागे उभे राहणं आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. जर चर्चा व्हायची असेल तर ती वरिष्ठ पातळीवर होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अमोल मिटकरी यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “सुनील तटकरेंनी यावर स्षष्टीकरण दिलं आहे. विलिनीकरणाची चर्चा आमच्या पक्ष पातळीवर सध्या तरी नाही. 15 दिवसांपूर्वी बारामतीत अजित पवारांवर अंत्यविधी झाल्यानंतर विलिनीकरणावर पहिली प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली होती. त्यानंतर हा विषय सुरु झाला. अंकुश काकडे यांनी 12 ताऱखेचा दावा केला होता. या त्या गटाने दिलेल्या माहिती आहेत. पण वरिष्ठ पातळीवरील बैठकीत किंवा आमच्या बैठकीत अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही अद्याप अजित पवार जाण्याच्या धक्क्यातून सावरलेलो नाही. अमोल कोल्हे यांनीच ही चर्चा सुरु केली”.
“पवार कुटुंब हे राजकारण आणि कौटुंबिक बांधिलकी वेगळं ठेवतं. जय पवार यांच्या लग्नात युगेंद्र पवार, रोहित पवार होते. शरद पवार प्रकृतीच्या कारणास्तव परदेशात गेले नव्हते. पण त्याचे वेगळे अर्थ लावले गेले. सुप्रिया सुळेंनीही त्यांच्या मुलीचं लग्न अजित पवारांच्यासमोर ठरल्याचं सांगितलं. परिवार आणि राजकारण हे वेगळं आहे. राजकारणात वेगळे असले तरी कौटुंबिकपणे एकत्र आहेत. हा महाराष्ट्रासमोर वेगळा आदर्श आहे,” असंही त्यांनी सांगितलं. विलिनीकरणासंदर्भात सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर निर्णय घेतील. त्या निर्णयाला आम्ही एकमताने पाठिंबा देऊ असं त्यांनी सांगितलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



