
NCP Merger News: राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. आंबेगावमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना दिलीप वळसे पाटलांना माजी मुख्यमंत्री अजित पवारांच्या आठवणींनी भरुन आलं. मात्र आपल्याला काहीही झालेलं नसून अजितदादांच्या आठवणींमुळे आपण भावूक झाल्याचं त्यांनी माईकवरच सांगितलं. मात्र त्याचवेळी दिलीप वळसे पाटलांनी मंगळवारी राज्यात मोठी राजकीय घडामोडी होण्यासंदर्भातील सूचक विधान केलं आहे.
महत्त्वाच्या बैठकीसंदर्भातील घोषणा…
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक घेणार असल्याचं दिलीप वळसे पाटलांनी स्पष्ट केलं. सध्याच्या पक्षाच्या विलिनीकरणाबाबत चर्चा करणार असल्याचं दिलीप वळसे पाटील म्हणाले. मंगळवारी मुंबईत ही बैठक होणार असल्याची माहिती राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचर येथील सभेत दिली. त्यामुळे आता 17 फेब्रुवारीच्या मुंबईच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळेच 17 फेब्रुवारीचा दिवस राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा दिवस ठरु शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मी भक्कम पण अजितदादांच्या…
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक काळात वळसे पाटलांची तब्येत नाजूक असल्याने वळसे पाटील डॉक्टरांच्या सल्ल्याने मुंबईत होते. त्यामुळे मतदारसंघात वळसे पाटील फारच आजारी असल्याची चर्चा होती. त्यावर वळसे पाटलांनी जहीर सभेच्या सुरुवातीलाच स्पष्टीकरण दिलं. मंचर येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीनंतर आभार मेळाव्यात दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांच्या निधनाचा धक्का बसल्याचं कबूल केलं. “मला काहीही झालेलं नाही. मी भक्कम आहे. फक्त अजितदादांच्या जाण्यामुळे मला भावना आवरत नाहीत,” असे शब्द उच्चारताना देखील वळसे पाटील भावुक झाले.
बारामतीत पार पडली नवनिर्वाचित सदस्यांची बैठक
बारामतीच्या सहयोग भवनमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक पार पडली. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, सुरेश घुले यांसह इतर मंडळी या बैठकीला उपस्थित होती. इंदापूर दौंड पुरंदर आणि हवेली तालुक्यातील नवनिर्वाचित सदस्य या बैठकीला उपस्थित होते. 30 जून पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकार घेईल अशी माहिती यावेळेस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
विलिनीकरणावर कृषीमंत्री काय म्हणाले?
दादांचं जाण सगळ्यांना दुःखदायक आहे. मतदारसंघातील अडीअडचणी समजून घेऊन. भविष्यात काय मार्ग काढला पाहिजे याबाबत बैठकीत चर्चा झाली. विलनीकरणाबाबत मला माहिती नाही. वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील मी बोलणं उचित नाही. वहिनी प्रमुख आहेत सर्व वरिष्ठ बसून निर्णय घेतील. वहिनींना निर्णय घेऊ द्या, असं या बैठकीसंदर्भात बोलताना दत्तात्रेय भरणे म्हणाले. विलनीकरणासंदर्भात वरिष्ठ लेवलला निर्णय होईल, असं मोजक्या शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी उत्तर दिलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



