
MMRDA Projects: मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी काम करणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुन्हा एकदा जमिनींच्या विक्रीवर भर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. पायाभूत सुविधा, मेट्रो मार्ग आणि वाहतूक प्रकल्पांसाठी निधी उभारण्याचा हा मोठा स्रोत मानला जातो. गेल्या काही वर्षांत मोक्याच्या ठिकाणच्या जागांना उद्योग व व्यावसायिक क्षेत्रातून मोठी मागणी मिळाल्याने प्राधिकरणाचा महसूल वाढला आहे. आता नव्या अर्थसंकल्पातही मोठ्या प्रमाणावर भूखंड विक्रीची योजना जाहीर झाल्यामुळे विकासकामांना गती मिळणार की भविष्यात निधीवर ताण येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सविस्तर जाणून घ्या या जमीन कोणाला आणि का विकल्या?
एमएमआरडीएचा अर्थसंकल्प आणि निधी उभारणी
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुमारे 48000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या निधीसाठी कर्ज, सरकारी मदत, मेट्रो संचालनातून मिळणारे उत्पन्न आणि जमीन विक्री असे विविध मार्ग वापरण्यात येणार आहेत. त्यापैकी जवळपास 21 ते 22 टक्के म्हणजे 11177 कोटी रुपये केवळ भूखंड विक्रीतून मिळवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या जमिनी वांद्रे-कुर्ला संकुल, ओशिवरा जिल्हा विकास केंद्र, वडाळा आणि कर्नाळा-साई चिरनेर परिसरात आहेत. व्यावसायिक वापरासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांना या जागा देऊन विकास प्रकल्पांसाठी निधी उभा केला जाणार आहे.
चार वर्षांतील जमीनविक्रीचा आढावा
मागील 4 वर्षांत प्राधिकरणाने सुमारे 9405 कोटी रुपयांचे भूखंड विकले आहेत. त्यामध्ये बीकेसीमधून 5534 कोटी, ओशिवरा जिल्हा विकास केंद्रातून 13 कोटी, वडाळा ट्रक टर्मिनल परिसरातून 1630 कोटी तर कर्नाळा-साई चिरनेर भागातून सुमारे 4000 कोटी रुपयांची अपेक्षित विक्री नोंदवली गेली आहे. वर्षानुसारही महसूल वाढत गेला असून 22-23, 23-24, 24-25 आणि 25-26 या कालावधीत अनुक्रमे 1260, 1052, 2512 आणि 4582 कोटी रुपये मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.
भूखंडविक्रीवरील अवलंब वाढणार का?
अर्थसंकल्प शिलकीचा असला तरी प्रत्यक्ष शिल्लक रक्कम सुमारे 17 लाख रुपये इतकी मर्यादित आहे. त्यामुळे भविष्यातील प्रकल्पांसाठी जमीन विक्रीवर अधिक अवलंबून राहावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तज्ञांच्या मते, विक्रीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला तर विकासकामांना वेग मिळेल; मात्र प्रतिसाद कमी राहिल्यास निधीअभावी प्रकल्पांना अडचणी निर्माण होऊ शकतात.
हे ही वाचा: मुंबई-पुणे वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना टोलचे पैसे परत मिळणार, तारीख जाहीर झाली; कधी येणार खात्यात पैसे?
विकासकामांवर परिणाम काय
मेट्रो मार्ग, रस्ते, वाहतूक सुविधा आणि शहरी पायाभूत कामांसाठी मोठ्या निधीची गरज असते. त्यामुळे मिळालेला पैसा थेट विकास योजनांकडे वळवला जाणार आहे. येत्या काळात जमीनविक्रीला उद्योगजगताचा कसा प्रतिसाद मिळतो, यावर मुंबई महानगर प्रदेशातील अनेक प्रकल्पांचे भविष्य ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



