
Chhatrapati Shivaji Maharaj Hand And Footprint: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज 396 वी जयंती असून महाराष्ट्रच नाही तर जगभरातील शिवप्रेमींकडून मोठ्या उत्साहात आज शिवजयंती साजरी केली जात आहे. शिवजन्मभूमी जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांच्या जन्मसोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी रितेश देशमुखही उपस्थित होता. राज्यातही किल्ले रायगड, कोल्हापूर, नागपुरसहीत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवरायांनी उभारलेल्या गडकिल्ल्यांवरही मोठ्या उत्साहात शिवजयंती सोहळा साजरा केला जात आहे. मात्र याच किल्ल्यांपैकी एकावर शिवरायांच्या हाताचा आणि पायाचा ठसा आहे हे तुम्हाला माहितीये का? हा किल्ला कोणता? तिथे कसं जायचं? यासंदर्भातील तपशील आज आपण जाणून घेणार आहोत.
हे ठसे इथे आले कसे?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उजव्या हाताचा ठास (हाताचा ठसा) आणि डाव्या पायाचा ठसा आहे. हे दोन्ही ठसे दगडात कोरलेले आहेत. हे दोन ठसे किल्ल्यावरील छोट्या देवळ्यांमध्ये आहेत. महाद्वारपासून उजव्या बाजूच्या तटबंदीवर या छोट्या देवळ्या आहेत. किल्ल्याचं बांधकाम सुरू असताना महाराजांनी ओल्या दगडावर हात-पाय ठेवला आणि गवंड्याने तो तसाच ठेवला, असं या ठशांबद्दल बोलताना स्थानिक लोक सांगतात. याशिवाय किल्ल्यात श्री शिवराजेश्वर मंदिर आहे. हे शिवरायांना समर्पित महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आहे. हे राजाराम महाराजांच्या काळात 1695 साली बांधलेलं आहे.
कोणत्या किल्ल्यावर आहेत हे ठसे?
सदर ठसे हे कोकणातील मालवणमध्ये असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यात आहेत. हा एक जलदुर्ग आहे.
इथं कसं जाल?
रेल्वे मार्ग
कोकण रेल्वेने कुडाळ (KUDL) किंवा सावंतवाडी (SWV) स्टेशनला पोहचा. तिथून बस अथवा ऑटो अथवा टॅक्सीने साधारण पाऊण ते एक सात प्रवास करुन 25 ते 40 किलोमीटरवर सिंधुदुर्ग किल्ला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बस
बसने जाणार असाल तर सिंधुदुर्ग मुंबईपासून 500 किलोमीटरवर आणि पुण्यापासून 400 किलोमीटरवर आहे. या दोन शहरांमधून सिंधुदुर्गला राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बस म्हणजेच एसटी जातात. याशिवाय कोल्हापूर, सातारा, सोलापूरहून एसटी बस मालवण डेपोला जातात.
स्वत:च्या गाडीने
रस्ते मार्गाने तुम्ही स्वत:च्या गाडीनेही सिंधुदुर्गला जाऊ शकता. राष्ट्रीय महामार्ग 66 म्हणजेच मुंबई-गोवा हायवेवरून या किल्ल्याला भेट देण्यासाठी जाता येईल.
विमानाने
विमानानेही तुम्हाला सिंधुदुर्गला जाता येईल. येथील चिपी एअरपोर्टपासून सिंधुदुर्ग किल्ला 22 किलोमीटरवर आहे. तर गोव्यातील दाबोलीम अथवा मोपा विमानतळ 130 किलोमीटरवर आहे.
मालवणपासून किल्ल्यापर्यंत कसे जाल?
मालवण जेट्टीवरून (धक्का) सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी बोटींची सुविधा आहे. जेट्टीपासून एका किलोमीटर अंतरावर समुद्रात कुरटे बेटावर सिंधुदुर्ग किल्ला आहे. दर 15-30 मिनिटांनी एक बोट असते. सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत बोटी चालतात. समुद्र शांत असेल तर 10 ते 15 मिनिटांमध्ये किल्ल्यावर पोहोचता येतं. या किल्ल्यावर जाऊन येण्यासाठी म्हणजेच राऊंड ट्रिप पद्धीतने 50 ते 100 रुपये प्रती व्यक्ती आकारले जातात. पावसाळ्यामध्ये म्हणजेच जून आणि सप्टेंबरदरम्यान बोटींची संख्या कमी असते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



