
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आज पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी नवे पुरावे, तांत्रिक माहिती व तपासासाठी काही महत्त्वाचे दस्तऐवज सादर करू शकतात अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांचा गत 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूविषयी वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. विशेषतः आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांचा मृत्यू हा अपघाती नसून घातपात असल्याचा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी त्यांच्या यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत विमानाच्या वैमानिकाला हाताशी धरून अजित पवारांचा घातपात केल्याचा दावा केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा ते दिल्लीत पत्रकारांना सामोरे जात आपल्या दाव्याची खातरजमा करणारे काही तांत्रिक पुरावे सादर करण्याची शक्यता आहे. रोहित पवार यांनी गत 18 तारखेला मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी अजित पवारांच्या अपघातावेळी विमानातील इंधनाचे प्रमाण, स्फोटाची तीव्रता, इतर तांत्रिक गोष्टी व तपास प्रक्रियेतील काही कच्च्या दुव्यांवर बोट ठेवले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अजितदादांच्या निधनाविषयी वेगवेगळ्या शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत. आजही रोहित पवार याविषयी काही नवे पुरावे, तांत्रिक माहिती व तपासाशी संबंधित काही महत्त्वाचे दस्तऐवज सादर करण्याची चिन्हे आहेत. रोहित पवारांनी टोर्लर्सचा घेतला होता समाचार रोहित पवार यांनी नुकतेच या प्रकरणी त्यांच्यावर टीका करणाऱ्या ट्रोलर्सचा खरपूस शब्दांत समाचार घेतला होता. भाजप व इतर काही ट्रोलर्स, मी अजितदादांच्या विमान अपघाताबाबत जे काही बोलत आहे, त्यावरुन मला वेड लागल्याची टीका करत आहेत. होय, मला अजितदादांवरील प्रेमापोटी वेड लागलंय. पण भाजप आणि इतर ट्रोलर्सना पैसे घेऊन काम करण्याचं वेड लागलंय. मला माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड लागलं आहे. मला एकट्यालाच नाही तर महाराष्ट्रातील जनतेला हे वेड लागले आहे. आमच्याकडे स्वाभिमानी मराठी माणूस आहे. या सगळ्या लोकांना मला एक सांगायचं आहे की, तुम्ही मला पाण्यात बघत आहात. पण माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका खूप मोठे होते आणि मी रोहित पवार आहे. या महाराष्ट्रातील स्वाभिमानी मराठी नागरिक माझ्यासोबत आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरही केले होते भाष्य रोहित पवारांनी यावेळी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणावरही भाष्य केले होते. ते म्हणाले होते, मला विलीनीकरणावर बोलायचे नव्हते. पण जर हे दोन पक्ष एकत्र आले असते आणि अजितदादांची इच्छा दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची होती. भावनिक दृष्टीने ते विचार करत होते. राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद डॉ. अमोल कोल्हे यांना देण्यात आले असते. दुसऱ्या गटातील लोकांना विलीनीकरणावर बोलायला भारी वाटते. त्यांच्या पत्रकार परिषद पाहिल्या तर त्यांना विलीनीकरणावर बोलायला फार आवडते. आम्हीच अजितदादांचा अपघात की घातपात या विषयावर बोलतोय. त्यामुळे त्यांना ज्या विषयावर बोलायचे आहे त्यावर मी बोलले पाहिजे असे वाटत नाही, असे ते म्हणाले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



