
मुल होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेस मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या जालना जिल्हयातील दुधा येथील सासरच्या पाच जणांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 23 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ येथील लहुजी नगर येथील रहिवासी असलेल्या मनिषा यांचा विवाह जालना जिल्हयातील दुधा येथील आकाश घोळे याच्या सोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवस त्यांना चांगले वागविल्यानंतर सासरच्या मंडळींनी त्यांना त्रास देण्यास सुरवात केली. मुल होत नाही या कारणावरून त्यांचा छळ केला जाऊ लागला होता. या शिवाय माहेरावरून 1 लाख रुपये घेऊन ये या कारणावरून छळ करून माररहाण केली जात होती. दरम्यान, माहेरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्या पैसे आणू शकत नव्हत्या. सदर बाब लक्षात आल्यानंतर त्यांच्या सासरच्या मंडळींनी त्यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. सासरचा छळ असह्य झाल्याने त्या मागील काही दिवसांपासून माहेरी राहण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर मनिषा यांनी सोमवारी ता. 23 थेट औंढा नागनाथ पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी आकाश घोळे, उकंडी घोळे, विष्णू घोळे, संगीता घोळे, लक्ष्मी घोळे (सर्व रा. दुधा, ता. मंठा, जि. जालना) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार व्ही. बी. पठाण, रवीकांत हरकाळ पुढील तपास करीत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



