digital products downloads

होर्मुझहून तेलाचे जहाज मुंबईत, युद्धानंतर पहिल्यांदा भारतात: तीन वेळा इराणशी चर्चा केल्यानंतर सामुद्रधुनीतून बाहेर

होर्मुझहून तेलाचे जहाज मुंबईत, युद्धानंतर पहिल्यांदा भारतात:  तीन वेळा इराणशी चर्चा केल्यानंतर सामुद्रधुनीतून बाहेर

  • Marathi News
  • National
  • Oil Ship From Hormuz Arrives In Mumbai, First Time In India Since War, Exits The Strait After Three Rounds Of Talks With Iran

मुंबई/नवी दिल्ली1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

अमेरिका-इराण युद्धामुळे देशभरात निर्माण झालेल्या एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी समोर आली आहे. लायबेरियाचा ध्वज असलेले ‘शेनलाँग सुएझमॅक्स’ हे तेलवाहू जहाज सौदीतून कच्चे तेल घेऊन गुरुवारी मुंबई बंदरात दाखल झाले. २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर होर्मुझ जलमार्गातून प्रवास करून भारतात आलेले हे पहिले जहाज आहे.

यात १.३५ लाख मेट्रिक टन कच्चे तेल असून ते पूर्व मुंबईतील माहूल येथील रिफायनरींना पाठवले जाईल. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची यांच्याशी होर्मुझमधून भारतीय जहाजांच्या सुरक्षित प्रवासाबाबत संवाद साधला. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार होर्मुझमधून २० टँकर बाहेर काढण्यासाठी चर्चा सुरू आहे. पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, भारताकडे पुरेसा इंधन साठा आहे. सध्या ऐतिहासिक संकट आहे, असे आयईएने म्हटले.

होर्मुझहून तेलाचे जहाज मुंबईत, युद्धानंतर पहिल्यांदा भारतात: तीन वेळा इराणशी चर्चा केल्यानंतर सामुद्रधुनीतून बाहेर

इंडक्शन विक्रीमध्ये ९४% वाढ

आखातातील युद्धामुळे गॅसची टंचाई वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने शहरी भागात सिलिंडर बुकिंगसाठी २५ दिवसांची मुदत जाहीर केली होती. केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक गॅस उत्पादन मंत्री हरदीप पुरी यांनी गुरुवारी सांगितले की, आता ग्रामीण भागात एकदा सिलिंडर घेतल्यावर दुसरे सिलिंडर ४५ दिवसांनी नोंदवता येईल.

दरम्यान, भारतीय गॅस उत्पादक कंपन्यांनी परदेशात गॅस निर्यात करणे थांबवावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाली आहे. दुसरीकडे इंडक्शन (विजेवर चालणारी शेगडी) विक्रीमध्ये ९४ टक्के वाढ झाली आहे. सूत्रांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय करारानुसार भारत नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमारला गॅस निर्यात करतो. ही निर्यात बंद करून भारतात पुरवठा वाढवावा. एस्मा कायद्यानुसार सरकारला निर्यातीत बदलाचे अधिकार आहेत. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक शहरांत इंडक्शन विक्री वाढली आहे. अनेक ठिकाणी साठा संपल्याने नागरिक हैराण आहेत.

होर्मुझहून तेलाचे जहाज मुंबईत, युद्धानंतर पहिल्यांदा भारतात: तीन वेळा इराणशी चर्चा केल्यानंतर सामुद्रधुनीतून बाहेर

जळगाव: १५० पैकी ७० चटई उद्योग बंद पडणार

जळगाव|युद्धामुळे चटई निर्मितीस लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर ८०% वाढले. शहरातील १५० पैकी ७० चटई निर्मिती उद्योग आठवडाभरात बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर सोलापुरात अक्कलकोट रोड, चिंचोली, होटगी रोड एमआयडीसीत फूड प्रोसेसिंग, फार्मा, फाँड्री, मेटल प्रोसेसिंगसह ९० उद्योगांतील उत्पादन गुरुवारी ठप्प झाले. ४ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय रमजानसाठी निर्यात होणारे २ कोटी रुपयांचे पापड पडून आहेत.

अमेरिकेला इशारा – आखात रक्ताने माखू..

इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिले वक्तव्य केले. गुरुवारी टीव्हीवरील अभिभाषणात खामेनी म्हणाले, आम्ही आक्रमकांच्या रक्ताने पर्शियन आखात लाल करू. शत्रूवर दबावासाठी सामुद्रधुनी बंद केली जाईल. या प्रदेशातील सर्व अमेरिकन तळ बंद करा. अन्यथा हल्ले सुरू राहतील. इराणला त्याच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध हवे आहेत. ते फक्त त्यांच्या भूमीवरील अमेरिकन तळांना लक्ष्य करत आहे आणि हे हल्ले सुरूच राहतील.

जहाजाचा ‘डार्क मोड’….

हे तेलवाहू जहाज १ मार्च रोजी सौदीच्या रास तनुरा बंदरातून १,३५,३३५ मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन रवाना झाले. ८-९ मार्च रोजी जेव्हा हे जहाज युद्धग्रस्त होर्मुज जलमार्गाच्या सर्वात धोकादायक भागात पोहोचले, तेव्हा भारतीय कप्तानाने एक धाडसी निर्णय घेतला. जहाजाचे AIS ट्रान्सपाँडर बंद करण्यात आले. या ‘डार्क मोड’मुळे हे जहाज कोणालाही दिसत नव्हते, ना इराणी नौदलाला, ना ट्रॅकिंग एजन्सींना. हेच त्याच्या सुरक्षेचे सर्वात मोठे शस्त्र ठरले. होर्मुज ओलांडल्यानंतर १० मार्च रोजी हे जहाज पुन्हा ट्रॅकिंग सिस्टिमवर दिसले आणि १२ मार्च रोजी मुंबईच्या जवाहर बेटावर (बुचर आयलंड) स्थिरावले.

शाह यांच्या अध्यक्षतेखाली समिती…

  • इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. यामध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांचाही समावेश आहे. ही समिती आढावा घेईल.
  • मुंबईतील रेस्टॉरंट, हॉटेलचालकांनी ‘गॅस पुरवठा बंद आहे, त्यामुळे मेन्यू कार्डवरील सर्वच खाद्यपदार्थ उपलब्ध नाहीत.’ असे ग्राहकांना सांगणारे सूचना फलक ठळकपणे लावले आहेत. अशीच स्थिती राज्यभरात दिसत आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp