
हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी बळीराजा अधिक सक्षम व्हावा आणि शेती व्यवसाय किफायतशीर व शाश्वत व्हावा, या उद्देशाने शासनाच्या कृषी योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक अभिनव कार्यक्रम राबवण्यात आला. ‘कवी संमेलनातून शेताच्या बांधावर कृषी योजनांचा जागर’ असे या कार्यक्रमाचे नाव होते. परतवाडा जवळील हनवतखेडा येथील शेतकरी देवानंद आमले यांच्या शेतात कृषी विभागाच्या सहभागातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना राहुल सातपुते म्हणाले की, शासनाचे धोरण शेतकरी हिताला बळ देणारे आहे. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत शासनाद्वारे विविध कृषी योजना राबविण्यात येत आहेत. महाविस्तार एआय ॲपच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून, शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी कृषी प्रशिक्षण व व्यवस्थापन प्राधिकारिणीच्या (आत्मा) प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव, तालुका कृषी अधिकारी अक्षय क्षीरसागर, वऱ्हाडी कवी प्रा. विठ्ठल कुलट, विजय सोसे, राजा धर्माधिकारी, गौतम गुळधे, गजानन मते, जितेंद्र रोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अतुल वाठ, अचलपूर खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रभुदास ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. कवी संमेलनाच्या माध्यमातून कृषी योजनांचा जागर करण्यात आला. प्रा. विठ्ठल कुलट यांनी कवितेतून कृषी विभागाच्या यांत्रिकीकरणामुळे गावात क्रांती झाल्याचे सांगितले. ट्रॅक्टर, पाणी, बियाणे अनुदानाची पहाट उगवली असून, कृषीदूतांनी अन्नदात्यांचा सन्मान करत सेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले. राजा धर्माधिकारी यांनी भारूडातून ‘आता शेती विकायची नाही, गोंधळून जायचे नाही, महाविस्तार एआय सांगतो, शेतीतून मार्ग काढायचा आहे’ असा संदेश दिला. विजय सोसे यांनी ‘कृषी यंत्राला मिळे अनुदान, कास्तकाराला पहिलाच मान, थांबू पाण्याची नासाडी, ठिबक-तुषाराची लागली नाडी. कृषी खात्याची गोठच न्यारी’ अशी कविता सादर केली. तर गजानन मते यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा संदेश देत ‘जुन्याबरोबर नवे तंत्रज्ञान, मातीतून उगवेल सोनं, कृषी खात्याच्या आधाराने, शेतकरी होईल सक्षम’ असे म्हटले. गौतम गुळधे यांनी शेतकऱ्यांना आवाहन करत ‘शासनाकडे योजनांचा साठा, घ्या त्याचा योग्य फायदा, उत्पन्न वाढवा बळीराजा, कमी होईल तुमचा त्रास मोठा’ अशी कविता सादर केली. प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी शेताच्या बांधावर थेट संवाद साधत कवितेतून दिलेली माहिती अधिक प्रभावी ठरते, असे नमूद केले. ‘मातीशी नाते आणि शेती विकासाची गती’ हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



