
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले आहे. धर्मांतर विरोधी कायद्याला देखील त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. तसेच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही, त्यावरून सरकार घाबरत आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आता गेल्या काही वर्षांमध्ये जास्त करून भाजप प्रणीत सरकार राज्य आणि केंद्रात सत्तेवर आहे. असे हे सरकार असताना सुद्धा बळजबरीने किंवा फसवून धर्मांतराच्या संख्येत वाढ झाली असेल तर ते अपयश कोणाचे आहे? याचे उत्तर मिळाले पाहिजे. नेमके कोणत्या समाजात, कोणत्या विभागात धर्मांतर होत आहेत, याची माहिती दिली तर आम्हाला सुद्धा सावध राहता येईल. आमचे सुद्धा कार्यकर्ते तिथे तत्पर राहतील. बळजबरीने कोणी धर्मांतर करत असेल तर त्याला आम्ही सुद्धा विरोध करू, असे म्हणत धर्मांतर विरोधी कायद्याला पाठिंबा असल्याचे देखील ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते पदावर भाष्य करताना म्हटले की, इतिहासात आम्ही पहिल्यांदाच असे पाहत आहोत की दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही. का घाबरत आहे सरकार? आम्ही प्रत्येक वेळेस जाऊन त्यांना विनंती केली होती. पण त्यांनी यावर अद्यापही निर्णय घेतला नाही. हे सगळे एकतर्फे कारभार सुरू असल्याची टीका ठाकरेंनी केली आहे. बेळगावमध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर महाराष्ट्र गीत काही मराठी तरुणांनी वाजवत जल्लोष केला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याविषयी प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला पाहिजे. सरकार कोणाचेही असो, मराठी माणसांवर जसे जोरजबरदस्ती धर्मांतराला आम्ही विरोध करत आहोत, तसेच जोरजबरदस्ती भाषा, मग ती कोणाचीही असो, ती लादणे अयोग्य आहे. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप केला पाहिजे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



