
नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. सर्वत्र अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवला जात असतानाच, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. “गेल्या दीड-दोन वर्षांपासून असलेल्या माझ्या घशाच्या समस्येवर औषधांनी काहीही फरक पडला नाही, मात्र गुरुजीदेवजींच्या आशीर्वादामुळे आज मी स्पष्ट बोलू शकत आहे,” असा दावा महापौरांनी केला आहे. महावीर जयंती निमित्त बोरोवली कोरा केंद्र मैदानात भगवान महावीर जन्म कल्याणक मोहत्सव साजरा होत आहे. या महोत्सवात महापौर रितू तावडे बोलत होत्या. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी गुरुजीदेवजींच्या ‘चमत्कारा’चा अनुभव कथन केला. त्या म्हणाल्या, “दीड वर्षांपासून मला घशाचा तीव्र त्रास होता. मी अनेक औषधे घेतली, उपचार केले, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी मी गुरुजींना या आवाजाच्या समस्येबद्दल सांगितले. त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि आज तुम्ही पाहताय की मी तुमच्यासमोर स्पष्टपणे बोलू शकत आहे. माझ्यासाठी हा एक मोठा चमत्कार असून, आज मला एक सकारात्मक ऊर्जा जाणवत आहे.” मंत्री लोढांकडूनही ‘चमत्कारा’चा उल्लेख महापौर रितू तावडे यांच्या या विधानानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील गुरुदेवजींच्या चमत्काराचा उल्लेख केला. “गुरुदेवजींची भेट घेतल्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या आशीर्वादामुळेच रितू तावडे मुंबईच्या महापौर होऊ शकल्या,” असे विधान लोढा यांनी केले. यामुळे महापौरांच्या पदाला केवळ राजकीय नव्हे, तर आध्यात्मिक अधिष्ठान असल्याचे लोढा यांनी सुचवल्याची चर्चा रंगली आहे. ‘भोंदूगिरी’च्या वादात महापौरांचे विधान चर्चेत सध्या राज्यात अशोक खरात या भोंदू बाबाने केलेल्या लैंगिक शोषणाचे आणि फसवणुकीचे प्रकरण गाजत आहे. सर्वच स्तरातून बुवाबाजी आणि अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन केले जात असताना, देशाच्या आर्थिक राजधानीच्या प्रथम नागरिकाने जाहीरपणे ‘चमत्कारा’ची भाषा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका बाजूला सरकार अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदे करत असताना, दुसरीकडे जबाबदार पदावरील व्यक्तींकडून ‘चमत्कारा’चे जाहीर समर्थन झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबईच्या महापौरांनी आजाराचे निवारण चमत्काराने झाल्याचे सांगितल्याने विरोधक आता यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… भोंदू खरातची SIT कडून 5 तास चौकशी:महिला, नेते, सर्वसामान्यांसाठी 4 वेगवेगळे नंबर; महिलांना दिवस जाऊ नये म्हणून घेत होता काळजी भोंदू अशोक खरातकडे एक नव्हे तर तब्बल 4 मोबाईल क्रमांक असल्याची बाब समोर आली आहे. हे चारही नंबर तो वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी वापरत होता. विशेषतः खरातने आपल्या जाळ्यात नाशिकमधील नामवंत डॉक्टरलाही ओढले होते. त्यांच्या मदतीने तो आपल्या जाळ्यात अडकणाऱ्या महिलांना गर्भपाताची औषधे देत असल्याचा संशय आहे. त्यामुळे हे डॉक्टरही आता चौकशीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



