
Maharashtra
-Pritesh Suryawanshi
राज्यात सध्या ‘ऑपरेशन टायगर’च्या वावड्यांनी राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या असून, नुकतीच ठाण्यात एक गुप्त बैठक पार पडल्याची चर्चा आहे. बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांनी आपला अधिकृत ताफा बाजूला ठेवून ठाण्यातील व्होल्टास कंपनी परिसरात काही खासदारांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले.
या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते आणि ही चर्चा पहाटेपर्यंत चालल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या खासदारांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला असला, तरी शिंदे गटाकडून सुरू असलेल्या या गुप्त मोहिमेमुळे ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी अस्वस्थता पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खासदारांची उपस्थिती आणि ऑफरची चर्चा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीला अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख यांसारखे दिग्गज नेते प्रत्यक्ष हजर होते, तर ओमराजे निंबाळकर यांच्यासह अन्य काही खासदार व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात होते. या सर्व खासदारांना शिंदे गटात सामील होण्यासाठी मोठी ऑफर देण्यात आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, ज्या खासदारांनी मातोश्रीवर जाऊन निष्ठेची शपथ घेतली होती, त्यांचीच नावे या बैठकीच्या संदर्भात समोर आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे हे पडद्यामागून अजूनही ठाकरे गटाला खिंडार पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
ठाकरे गटाच्या खासदारांचे आक्रमक खंडन
या खळबळजनक वृत्तानंतर ठाकरे गटाच्या खासदारांनी तातडीने आपली भूमिका स्पष्ट करत या बातम्यांचे खंडन केले आहे. खासदार अरविंद सावंत यांनी अत्यंत भावनिक होत सांगितले की, “मी बाळासाहेबांचा निष्ठावान शिवसैनिक आहे आणि मरेपर्यंत भगवा सोडून कुठेही जाणार नाही. आईच्या दुधाशी प्रतारणा करणे माझ्या रक्तात नाही.” तर ओमराजे निंबाळकर यांनी ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे सांगत, जर अशी बैठक झाली असेल तर त्याचे फोटो समोर आणावेत, असे खुले आव्हानच दिले आहे. संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर यांनीही आपण अशा कोणत्याही बैठकीत नसल्याचे स्पष्ट करत याला केवळ अफवा ठरवले आहे.
संजय राऊतांचा प्रहार आणि वडेट्टीवारांची टोलेबाजी
या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊत यांनी नेहमीच्या शैलीत टीका केली. त्यांनी म्हटले की, “ही सर्व चर्चा हास्यास्पद असून केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत.” राऊत यांच्या मते, शिंदे गट स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडत असून ठाकरे गटाचे सर्व नऊ खासदार आजही एकजूट आहेत. दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर भाष्य करताना राजकारणातील घसरलेल्या नैतिकतेवर बोट ठेवले. “आजकाल कोणाचेही कोणाशी सोयरसुतक उरले नसून फोडाफोडीचे राजकारण ही फॅशन झाली आहे,” अशी टिप्पणी त्यांनी केली. यामुळे आता हे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होणार की हा केवळ हवेतील गोळीबार ठरणार, हे येणारा काळच ठरवेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.







