
Acharya Atre Birth Anniversary Special: महाराष्ट्राला लाभलेल्या कणखर आणि तितक्याच प्रभावशाली नेतृत्वांबद्दल बोलायचं झालं तर आचार्य अत्रेंचं नाव टाळून पुढे जाता येणार नाही. बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजे काय याची जाणीव अत्रेंनी निर्माण केलेलं साहित्य, राज्याच्या जडणघडणीमध्ये दिलेलं योगदानामधून होतं. संपादक, चित्रपट निर्माते, लेखक, कवी, नाटककार, शिक्षणतज्ज्ञ, राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपली छाप सोडणाऱ्या अत्रेंची अजून एक ओळख म्हणजे त्यांचा हजरजबाबीपणा! अत्रेंची मिश्लिक विधान असो किंवा जाहीर सभांमधील भाषणं असो त्यांचं भाषा प्रभुत्व आपोआपच अधोरेखित व्हायचं. असाच एक किस्सा आचार्य अत्रे आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासंदर्भत घडला.
आचार्य अत्रेंकडे नोंदवला आक्षेप
आचार्य अत्रेंनी नेहमीप्रमाणे आपल्या भाषणात, “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,” असं विधान अगदी ठामपणे केलं. या विधानामधील ‘झाला’ शब्दानंतरचा ‘च’ तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव यांना फारच खटकला. त्यांनी अत्रेंना तसं थेट बोलून दाखवलं. दोघेही आपल्या कठोर आणि स्पष्ट भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. मात्र बोलण्यात अत्रेंना कोणी मागे टाकू शकेल असं शक्यच नव्हतं. हाच अनुभव यशवंतरावांनी ‘च’ वर आक्षेप नोंदवल्यावर आला.
यशवंतरावांना जशास तसं उत्तर
यशवंतरावांनी ‘च’वर घेतलेल्या आक्षेपावर प्रतिक्रिया देताना अत्रेंनी, “‘च’ला एवढं महत्त्व कशाला असं म्हणता? ‘च’ किती महत्त्वाचा असतो, हे तुम्हाला सांगायला हवं का? तुमच्या अडनावातला ‘च’ काढला तर मागे काय राहतं ‘व्हाण’!” असं खोचक विधान केलं होतं. म्हणजेच चव्हाण या अडनावातून च काढला तर व्हाण म्हणजेच ग्रामीण भाषेत चप्पल शिल्लक राहते, असं अत्रेंना सूचवायचं होतं.
संरक्षणमंत्री झाल्यानंतर केलं कौतुक
मात्र अत्रेंचं खोचक बोलणं हे तेवढ्यापुरतं असायचं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनादरम्यान असे अनेक प्रसंग आले जेव्हा अत्रेंनी कठोर शब्दांमध्ये यशवंतरावांना लक्ष्य केलं. मात्र 1962 मध्ये यशवंतराव हे देशाचे संरक्षणमंत्री झाले. यशवंतरावांना विधानसभेतून निरोप देताना अत्रेंनी अत्यंत अप्रतिम भाषण केलं होतं. “यशवंतरावांचा स्वभाव, त्यांचे वागणे आणि त्यांचे बोलणे हे सारेच काही असे आहे की त्यांचे शत्रुत्व करू इच्छिणाऱ्या माणसालासुद्धा यशस्वीपणे फार काळ शत्रुत्व करणे शक्य होत नाही असे मी माझ्या अनुभवावरून सांगतो,” असं अत्रे यशवंतरावांच्या निरोपाच्या भाषणात म्हणाल्याचा उल्लेख अत्रेंच्याच अत्रेटोला या पुस्तकात आहे.
FAQ
प्रश्न 1: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संदर्भात आचार्य अत्रे यांचं काय विधान होतं?
उत्तर: आचार्य अत्रे यांनी, “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,” असं ठाम विधान केलं.
प्रश्न 2: हा किस्सा कोणत्या पुस्तकात नमूद आहे?
उत्तर: हा किस्सा आचार्य अत्रे यांच्याच ‘अत्रेटोला’ या पुस्तकात नमूद आहे.
प्रश्न 3: आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांच्या संबंधांबद्दल काय सांगता येईल?
उत्तर: आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कठोर शब्दांत एकमेकांवर टीका केली, पण त्यांच्यात परस्पर आदर होता, जे अत्रेंच्या निरोपाच्या भाषणातून दिसून येते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.