
Sharad Pawar And Ajit Pawar: दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रादीच्या नेत्यांची गैरहजेरी पाहायला मिळाली. दरम्यान यानंतर शरद पवारांनी इंडिया आघाडीपासून फारकत घेतली का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत दिल्लीत मंगळवारी इंडिया आघाडीची बैठक झाली. या बैठकीला पवारांच्या पक्षातला कोणताही नेता उपस्थित नव्हता. यानंतर उलटसुलट चर्चांना सुरुवात झालीय.
शरद पवार इंडिया आघाडीपासून दूर जातायत?
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तसंच दुसरीकडे शरद पवार इंडिया आघाडीपासून दूर जातायत का? असाही सवाल उपस्थित करण्यात येतोय. कारण ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेचे विशेष अधिवेश घेण्यात यावं अशी मागणी इंडिया आघाडीनं केलीय. यासंदर्भात इंडिया
‘इंडिया आघाडी अस्तित्वातच नाही’
आघाडीची बैठक देखील झाली. मात्र, या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते गैरहजर होते. तसंच ज्या पत्राद्वारे विशेष अधिवेशनाची मागणी केली त्या पत्रावर शरद पवारांची सही देखील नव्हती. त्यामुळे शरद पवारांचा हा दुरावा नव्या समिकरणाची नांदी आहे का? अशा चर्चांना देखील तोंड फुटलंय. इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गैरहजेरीनंतर मंत्री संजय शिरसाट यांनी टोला लगावला आहे. इंडिया आघाडी अस्तित्वातच नसल्याची टीका संजय शिरसाट यांनी केलीय.
शरद पवारांच्या मनात नेमकं चाललंय काय?
खासदार सुप्रिया सुळेंचा परदेशात गेलेल्या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरसंदर्भातली भूमिका त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडतायत. तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारल्यामुळे शरद पवारांच्या मनात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
शरद पवार नेमकं काय म्हणालेले?
एका मुलाखतीदरम्यानच्या अनौपचारिक गप्पांदरम्यान दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं की नाही याचा निर्णय पुढच्या पिढीने घ्यावा, मी त्या निर्णय प्रक्रियेत नाही असं पवार म्हणाले होते. तेव्हापासूनच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा रंगू लागली आहे. अगदी अजित पवार सुप्रिया सुळे एकत्र येण्याचा निर्णय घेण्यापासून दोन्ही बाजूकडील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी घेतलेली वेट अॅण्ड वॉचची भूमिका अशा बऱ्याच बातम्या समोर आल्यानंतर शरद पवार यांनी केलेल्या विधानावर पहिल्यांदाच अजित पवार बोलल्याचं पाहायला मिळालं आहे.
अजित पवार पक्षाच्या आमदारांना काय म्हणाले?
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती लागण्याची शक्यता असल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली जात असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. आगामी काळातील पक्षातील गळती थांबवण्याच्या अनुषंगाने शरद पवारांकडून वक्तव्य आली असतील अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला राम राम करण्याची हालचाल सुरू असेल म्हणूनच शरद पवारांकडून पक्ष एकत्रीकरणाबाबतचे सुतोवाच केले असतील,’ असं अजित पवार आमदारांच्या बैठकीमध्ये म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.