
Maharashtra Weather Update: राज्यात पावसाने कोकण आणि घाटमाथा या भागांमध्ये दमदार हजेरी लावली असून उर्वरित महाराष्ट्र मात्र अजूनही समाधानकारक पावसाची वाट पाहतो आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे व सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर शनिवारी, 29 जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाने या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. अन्य भागांत मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाचा आणि उकाड्याचा जोर वाढला आहे.
घाटमाथ्यावर पावसाचा कहर, इतरत्र मात्र उकाड्याची लाट
पश्चिम महाराष्ट्रात घाट परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून आंबोणे येथे 120 मिमी, ताम्हिणीमध्ये 110 मिमी, शिरगाव व इगतपुरी येथे प्रत्येकी 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याउलट, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा सुरूच आहे. शनिवारी सकाळी 8.30 पर्यंतच्या 24 तासांत जेऊरमध्ये राज्यातील सर्वाधिक 33.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
मॉन्सूनची आगेकूच थांबली
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर भारतातील राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या आणखी भागांमध्ये गुरुवारी (ता.26) प्रवेश केला. जैसलमेर, बिकानेर, भारतपूर आणि सोनीपतसारख्या भागांमध्ये मॉन्सून पोहोचला आहे. सध्या स्थिती पोषक असल्याने पुढील दोन दिवसांत संपूर्ण देशात मॉन्सून पूर्णपणे पोहोचण्याची शक्यता आहे.
उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचे संकेत
सौराष्ट्र व कच्छ परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे तसेच बांगलादेश परिसरातील हवामान स्थितीमुळे आज कमी दाबाचे आणखी एक क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ऑरेंज अलर्ट (जोरदार पावसाचा इशारा):
- रायगड
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- पुणे घाटमाथा
- सातारा घाटमाथा
येलो अलर्ट (सतर्कतेचा इशारा):
- पालघर
- ठाणे
- मुंबई
- नाशिक घाटमाथा
- कोल्हापूर घाटमाथा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.