
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेतृत्वावरून सुरू असलेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्याचे विधान एका मुलाखतीत केले होते. मात्र, या विधानावरून राजकीय वर्तुळात गदारोळ निर्माण होताच गोयल यांनी अवघ्या काही तासांत ‘यू-टर्न’ घेतला आहे. प्रफुल पटेल नव्हे, तर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालीच पक्ष काम करत असल्याचे सांगत त्यांनी आपल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. पियुष गोयल यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले होते. एका केंद्रीय मंत्र्यानेच ही माहिती दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. मात्र, हे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर पियुष गोयल यांनी स्पष्टीकरण दिले की, “एका वरिष्ठ पत्रकाराने मला ही चुकीची माहिती दिली होती. कोणतीही अधिकृत खातरजमा न करता मी ते वक्तव्य केले. आता मला समजले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वातच काम करत आहे.” नेमके काय म्हणाले पियुष गोयल? प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत, अशी चुकीची माहिती एका वरिष्ठ पत्रकाराने मला दिली होती. मात्र, मी कुठलीही अधिकृत माहिती घेतल्याशिवाय एका मुलाखतीत यासंदर्भात वक्तव्य केलं. पण, माझी माहिती चुकीची असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे, असे असे म्हणत केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनी घडल्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण दिले. तसेच, या चुकीच्या माहितीबद्दल मी खेद व्यक्त करतो, असेही गोयल यांनी म्हटलं. राज ठाकरेंच्या ‘ट्विट’ची मोठी चर्चा दरम्यान, पियुष गोयल यांच्या पहिल्या विधानानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर घेतलेली भूमिका या वादाच्या केंद्रस्थानी राहिली. राज ठाकरेंनी थेट शब्दांत सुनावले होते की, “राष्ट्रवादीसारख्या अस्सल मराठमोळ्या आणि रांगड्या मातीतील पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा कोणीही ‘पाटील’ असावा, पण ‘पटेल’ नसावा!” या भूमिकेला राष्ट्रवादीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनीही मोठा पाठिंबा दर्शवला होता. याच दबावामुळे किंवा चुकीची माहिती समोर आल्यामुळे पियुष गोयल यांना आपले शब्द मागे घ्यावे लागल्याची चर्चा आता रंगली आहे. काय म्हणाले होते पियुष गोयल? पियुष गोयक यांनी नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. “राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होईल असे मला वाटत नाही. अजित पवारांनी महायुतीत उत्कृष्टपणे काम केले आहे. आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पक्षाचे नेतृत्व करतील. प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. शरद पवार यांनी लोकांचा विश्वास व मते या दोन्ही गोष्टी गमावल्या आहेत. यामुळे त्यांना पुन्हा पक्षात निमंत्रित केले जाईल असे मला वाटत नाही,” असे पियुष गोयल म्हणाले होते. प्रफुल पटेल यांनीही फेटाळले वृत्त दुसरीकडे, स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी आपली नियुक्ती झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याचे वृत्त माध्यमांत आले आहे. या बातम्या पूर्णतः निराधार असून, त्यात कोणतेही तथ्य नाही असे मी स्पष्ट करू इच्छितो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही एक लोकशाही संस्था आहे. इतक्या मोठ्या निर्णयासाठी आमच्या ज्येष्ठ नेत्यांशी व आमदारांशी सल्लामसलत केली जाईल, पक्षाच्या समर्पित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाईल. आमच्या सर्व पक्ष सदस्यांच्या भावना व सामूहिक इच्छेचा आदर केला जाईल. एक राष्ट्रीय पक्ष असल्याने आम्ही अशा बाबतीत प्रस्थापित प्रक्रियेचे पालन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



