
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde What Happened In Supreme Court: ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात झालेली सुनावणी अवघ्या तीन वाक्यांमध्ये संपली असं थोडक्यात म्हणता येईल. सन 2022 पासून सुरु असलेल्या या न्यायालयीन लढ्यात आता न्यायालयाने पुढची तारीख दिली आहे. त्यामुळे आज यासंदर्भात काही मोठा निर्णय लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच विरोधी पक्षाच्या वकिलांनी काही दिवसांची मागणी केल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती वकील असीम सरोदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. मात्र न्यायालयाने प्रत्यक्षात तीन वाक्यांमध्येच ही सुनावणी पुढे ढकलली गेली.
न्यायालयात आज काय झालं?
असीम सदोरे यांनी पत्रकारांशी बोलताना, “आज पक्ष आणि चिन्ह बाबत सुनावणी झाली. आम्ही युक्तिवादाला 45 मिनिटांचा वेळ मागितला पण समोरच्या बाजूने जास्त वेळ लागेल अस सांगितलं,” अशी माहिती दिली. “कोर्टाने सुनावणीसाठी तत्परता दाखवली नाही. अंतिम सुनावणीची तारीख आहे असं आम्हाला वाटत होतं,” असंही सरोदे म्हणाले. “विरोधी वकिलांनी तीन दिवस युक्तिवादाला लागतील असं सांगितलं. महापालिका निवडणुका आहेत त्यामुळं सुनावणी घ्या असं आम्ही म्हणालो,” असं सरोदे म्हणाले.
“12 नोव्हेंबर पासून युक्तिवाद होईल. सुरुवातीला कपिल सिब्बल युक्तिवाद करतील. ज्यांची बाजू कमजोर असते त्यांना न्यायिक क्लुप्त्या करायच्या असतात. त्यांना वरून सांगितलं असेल त्यामुळं ते सुनावणी पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करत असतील,” असं सूचक विधान सरोदेंनी केलं. “12 तारखेला सूनवणी झाली तर निवडणुकीच्या आधी निर्णय येईल अशी अपेक्षा आहे,” असं सरोदे पत्रकारांना माहिती देताना म्हणाले.
ती तीन वाक्य कोणती?
सुनावणी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्जल भुईयां आणि एन. के. सिंग यांच्या खंडपीठासमोर झाली. या सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे यांच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाला मोजून 2 वाक्यात सांगितले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत होणार आहेत. त्यामुळे हे प्रकरण तातडीने ऐकले जाणे आवश्यक आहे.”
यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले की, “आम्ही ही याचिका 12 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणीसाठी घेऊ.” म्हणजेच, ठाकरे गटाने तातडीची मागणी केली असली तरी आता पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार आहे.
पक्ष फुटीपासून काय काय घडलं?
जून 2022 मध्ये, एकनाथ शिंदे यांनी 39 आमदारांसह बंड केले. ते भाजपसोबत जाऊन महाविकास आघाडी सरकार पाडले आणि शिंदे मुख्यमंत्री झाले. यामुळे शिवसेना दोन गटांत विभागली गेली. फेब्रुवारी 2023 मध्ये, निवडणूक आयोगाने (ईसीआय) पक्षाचे नाव ‘शिवसेना’ आणि चिन्ह ‘धनुष्यबाण’ शिंदे गटाला दिले. विधानसभेतील बहुमत (शिंदे गटाकडे 40+ आमदार). ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव आणि नवीन चिन्ह ‘मशाल’ मिळाले. ईसीआयने पक्षाच्या घटनेच्या (संविधानाच्या) आधारावर निर्णय घ्यावा, न की विधानसभेतील बहुमतावर, असं म्हणत ठाकरेंच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ठाकरे गटाकडून दोनदा या याचिकेची तातडीने सुनावणी घ्यावी असा अर्ज करुनही तो मान्य करण्यात आला नाही. आजही असेच काहीसे घडल्याचं सरोदेंच्या बोलण्यावरुन स्पष्ट होत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.