
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचे पडसाद अद्याप उमटत असून, आमदार रोहित पवार यांनी आता या प्रकरणात माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल पटेल यांना लक्ष्य केले आहे. “अजितदादांच्या अपघाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला आपण गेला होतात का?” असा थेट आणि खळबळजनक सवाल रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रफुल पटेलांना विचारला आहे. २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर रोहित पवार यांनी VSR कंपनीच्या विमानांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सीआयडीने कंपनीचे मालक आर. के. सिंग यांची चौकशी केली. याच संदर्भाचा धागा पकडत रोहित पवार यांनी प्रफुल पटेल यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. राजस्थानमधील ‘त्या’ लग्नाचे कनेक्शन? रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मिस्टर प्रफुल पटेल जी, आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला/घातपाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? जर गेला असाल, तर त्या लग्नात इतर कोणकोणते नेते आणि कोणत्या पक्षाचे लोक होते, हे महाराष्ट्राला सांगावे.” स्वार्थी की अजितदादा प्रेमी, हे स्पष्ट करा रोहित पवार यांनी पटेलांच्या निष्ठेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे आता महाराष्ट्राला दाखवून द्या. उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपण स्पष्टीकरण द्याल, अशी अपेक्षा आहे,” असे आवाहनही त्यांनी केले आहे. प्रफुल पटेलांच्या उत्तराकडे लक्ष प्रफुल पटेल हे देशाचे माजी नागरी उड्डाण मंत्री राहिले आहेत, त्यामुळे विमान कंपन्यांशी संबंधित तांत्रिक बाबी आणि संबंधांवरून रोहित पवारांनी केलेला हा आरोप अत्यंत गंभीर मानला जात आहे. जय पवार यांनी आर. के. सिंग यांचा एक व्हिडिओ शेअर केल्यानंतर रोहित पवारांनी थेट पटेलांनाच घेरल्याने आता या वादाला नवे वळण मिळाले आहे. यावर प्रफुल पटेल काय प्रत्युत्तर देतात, ते पाहावे लागणार आहे. रोहित पवारांनी घेतली केजरीवालांची भेट दरम्यान, रोहित पवार यांनी ३ दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपचे नेते संजय सिंह, अरविंद केजरीवाल यांची भेट घेत अजित पवार अपघात प्रकरणी संसदेमध्ये आवाज उठवण्याची मागणी केली आहे. रोहित पवा म्हणाले, महाराष्ट्रात इतक्या मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल तर संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आम्ही हा मुद्दा संसदेत उचलला जावा यासाठी विनंती केली. अजित पवार यांना न्याय मिळावा म्हणून तुम्ही जे काम करत आहात त्याला आम्ही साथ देऊ असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



