
Maharashtra Weather News : हिवाळा ऋतू सध्या तिसऱ्या टप्प्यात असून यानंतर ही थंडी देशातून काढता पाय घेईल. मात्र थंडीचा हा कडाका इतक्यात देशाची पाठ सोडणार नाही असंच चित्र पाहायला मिळत आहे. पर्वतांपासून मैदानी भागांपर्यंत हवामानामध्ये सातत्यानं बदल होत असून, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडसारख्या राज्यांमध्ये हिमवर्षावामुळं गारठा वाढला आहे. तर, वाऱ्याची ही एकंदर दिशा पाहून केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं अतिथंडीच्या या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील हवामानावर कसा होतोय या थंडीचा परिणाम?
महाराष्ट्रात कोणत्याही थंडीच्या लाटेचा इशारा नसला तरीही तापमानात होणारे चढ- उतार मात्र कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवार, 27 जानेवारी 2026 रोजी मुंबई शहरात काही भागांमध्ये रिमझिम पावसानं हजेरी लावली आणि हा नेमका कोणता ऋतू सुरुय याच पेचात नागरिकही पडले. पुढील 24 तासांमध्ये मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि मुंबईमध्ये प्रामुख्यानं हवामानात लक्षवेधी बदल पाहायला मिळणार असून, थंडी कमी होत असली तरीही ढगाळ वातावरणामुळं पावसाची शक्यता मात्र अधिक प्रमाणात वाढताना दिसत आहे.
एकाएकी पावसानं का लावलीय हजेरी?
राज्याच्या आणि देशाच्या किनारपट्टी भागांमध्ये वाऱ्याची दिशा बदलली असून, हवेतील आर्द्रतेत वाढ होताना दिसत आहे, ज्यामुळं मुंबईसह किनारपट्टी भागांमध्ये उष्मा अधिक प्रमाणात जाणवत आहे. तर, काही भागांमध्ये याच उष्म्याचं रुपांतर रिमझिम पावसाच होताना दिसत आहे. पुढील 24 तासांसाठी वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणातही आकाश अंशत: ढगाळ असेल. तर, घाटमाथ्यावर धुक्याची चादर आणि हवेत काहीसा गारठा जाणवेल. इथं सरासरी कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतकं असेल. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही वातावरण ढगाळ राहणार असून, नाशिक, धुळे, जळगाव इथंही पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान जाणकारांच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात सध्या ताशी 25 ते 30 किमी इतक्या वेगानं आर्द्रतायुक्त वारे वाहत असून, त्याच कारणास्तव कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाले आहेत. शिवाय पुढील 48 तासांमध्ये राज्यात तुरळक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्चवण्यात आला आहे.
देशातील हवामानात कसे बदल होणार?
IMD नं 13 राज्यांमध्ये वादळ आणि मुसळधार पावसाचा इशारा देत नागरिक आणि यंत्रणांना सतर्क केलं आहे. हिमाचल प्रदेशात हिमवर्षाव आणि पावसाचा इशारा असून, चंबा, कुल्लू, किन्नौर आणि लाहौल स्पितीला या स्थितीचा तडाखा बसू शकतो. पुढील 24 तासांमध्ये नव्यानं एक पश्चिमी झंझावात सक्रिय होच असून, त्यामुळं हवामान अस्थिर राहणार असल्यानं हिमवर्षाव आणि पावसानं उत्तर भारतातील राज्य बेजार होतील, तर उर्वरित भारतावर येथून वाहणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
हवामानाच्या सतत बदलणाऱ्या स्थितीकडे पाहता विशेषत: लहान मुलं आणि वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय पर्यटनासाठी उत्तर भारतातील पर्वतीय राज्य आणि पूर्वोत्तर भारतात जाणाऱ्या नागरिकांनी हवामान विभागाचे अंदाज, पूर्वानुमान पाहूनच पुढील प्रवासाची आखणी करावी आणि सतर्क राहत यंत्रणांना सहकार्य करावं असंही आवाहन करण्यात येत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



