
कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांनाच सुनावले. माणिकराव कोकाटे आज नाशिकमध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आढावा घेत होते. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे कर्जमाफीचा विषय काढला. त्यावर कृषिमंत्री मा
.
अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज दिवसभर नाशिक शहरात होते, पक्षाची बैठक आणि इतर बैठकीमुळे त्यांना अवकाळी भागाचा दौरा करण्यासाठी उशीर झाला. यावेळी शेतकऱ्यांनी माणिकराव कोकाटे यांना शेतकरी कर्जमाफीबाबत विचारणा केली असता त्यांनी उलट शेतकऱ्यांनाच सुनावले.
नेमके काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांना बांधावर आले असता, अजितदादा बोलले की कर्जमाफी होणार नाही, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना केला. शेतकऱ्याच्या या प्रश्नाचे उत्तर देताना माणिकराव कोकाटे यांनी जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावे, असा सल्ला दिला. कर्ज घ्यायचे आणि पाच ते दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचे नाही. समोर मीडिया उभी आहे. त्यामुळे मीडियासमोर मी जास्त बोलत नाही. पण मला एक सांगा, कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचे तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? असा सवाल माणिकराव कोकाटे यांनी केला.
विम्याच्या पैशातून साखरपुडे, लग्न करता
आता सरकार तुम्हाला (शेतकऱ्यांना) शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत. सिंचनासाठी पैसे आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करते. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा, असे विधान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्जमाफी हा माझा विषय नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असे माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. तर याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसून शेतकऱ्यांनी पीककर्ज भरावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले होते.
यापूर्वीही शेतकऱ्यांबाबत केले होते वादग्रस्त वक्तव्य
माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी देखील शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले होते. हल्ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केली, असे कोकाटे म्हणाले होते. ही योजना चांगली आहे. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. पण, या योजनेलाही गैरव्यवहाराचे ग्रहण लागले, असेही कोकाटे म्हणाले होते. माणिकराव कोकाटे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर शेतकऱ्यांसह विरोधकांनी जोरदार टीका केली होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.