
राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत माहिती देताना स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार असून आता 5 जुलैनंतरच त्यांना या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळू शकेल. कर्जमाफीच्या अटी आणि निकषांवर सविस्तर चर्चा झाली असून, प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सरकारच्या या विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त करत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्य सरकारचा कर्जमाफीच्या नावाखाली केवळ टाईमपास सुरू असल्याची सडकून टीका केली आहे. सभागृहात बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, कर्जमाफीच्या विषयात अटी निकष यावर चर्चा झाली. अटी निकष यात बदल होणे गरजेचे आहे, या संदर्भात विरोधी पक्षाकडून देखील चांगल्या गोष्टी मांडण्यात आल्या. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक आहेत. सरकारनं 30 जून ला कर्जमाफी दिली जाईल असे म्हटले होते. आज आपले अधिवेशन सुरु आहे, पुरवणी मागण्यांवर चर्चा करतोय, पुरवणी मागण्यांमध्येच शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीत जी रक्कम आहे, त्यावर चर्चा करतोय. योजनेला मंजुरी दिल्यानंतर राज्यपालांच्या सहीसाठी जाईल. राज्यपालांची सही होऊन 5 जुलैनंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम दिली जाईल, अशी माहिती भरणे यांनी दिली आहे. पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सगळ्यांना शेतकऱ्यांची काळजी आहे. आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत. या राज्यातील अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करणे, कर्जमाफी करणे आमचे कर्तव्य आहे, त्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत, तुम्ही काळजी घेऊ नका असे दत्तात्रय भरणे म्हणाले. आमदारांनी जे चांगले मुद्दे मांडले, त्याची नोंद घेऊन उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, असे भरणे म्हणाले. कारण नसताना सरकारकडून टाईमपास केला जातोय- राजू शेट्टी राजू शेट्टी म्हणाले, कारण नसताना सरकारकडून टाईमपास केला जातोय, पुढची तारीख सांगितली जातेय म्हणजे तारीख पे तारीख असे नाटक सरकारचे सुरु आहे. राज्यपालांकडे जायचे कारण नव्हते, अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीसाठी पैशांची तरतूद करत आहोत, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले होते. सरकार फक्त घोषणा करतंय, सरकारकडे पैसा नाहीये, तरतूद केलेल्या पैशांचा वापर दुसरीकडे केला असेल, असा दावाही त्यांनी केला आहे. पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले, एकदा सरकारने प्रामाणिकपणे कर्जमाफी करणार आहेत की नाही हे सांगावे. निकष, अटी याशिवाय सरकारने कर्जमाफी करावी. 30 जूनला शेतकऱ्यांची कर्जाची मुदत संपते म्हणजेच या वर्षी सुद्धा शेतकरी थकबाकीदार होतो. 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळाले असते ते देखील थकबाकीदार होऊ शकतील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
