
अमरावती आणि बडनेरावासियांना ६० किलोमीटर अंतरावरील सिंभोरा (ता. मोर्शी) येथील अप्पर वर्धा धरणातून पाणी उपलब्ध करून देणारे माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांचे कार्य अविस्मरणीय आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांच्या श्रद्धांजली सभेत हे प्रतिपादन केले. अमरावतीकर त्यांना कायम स्मरणात ठेवतील, असे गवई म्हणाले. विदर्भाच्या अनुशेष निर्मूलनाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रा. बी.टी. देशमुख यांना शनिवारी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन (नुटा) यांनी पीडीएमसी परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात या सभेचे आयोजन केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. प्रा. बी.टी. देशमुख यांच्या पत्नी श्रीमती सुशीलाताई देशमुख आणि नुटा संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विज्युक्टा संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, महापौर श्रीचंद तेजवानी, खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रा. बी.टी. देशमुख यांच्या कार्याला उजाळा दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपसह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पुढे सांगितले की, बी.टी. देशमुख आणि गवई कुटुंबाचे घनिष्ठ संबंध होते. देशमुख हे एक महान व्यक्तिमत्त्व होते, असेही त्यांनी नमूद केले. सभाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सभेचा समारोप केला. त्यांनी शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख, बी.टी. देशमुख आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकला. या सभेचे संचालन डॉ. किशोर फुले यांनी केले. प्रा. बी.टी. देशमुख यांच्या कार्याचे चाहते संपूर्ण राज्यभरातून या श्रद्धांजली सभेसाठी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
