
पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आज (28 जून) महत्त्वपूर्ण कारवाई केली. केतनची मंगेतर सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोन्ही मुख्य आरोपींना कडेकोट पोलिस बंदोबस्तात लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले. 18 जून रोजी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी ‘सीन रीक्रिएशन’ आयोजित केले आहे. केतनला कोणत्या कड्यावरून 400 फूट खोल दरीत ढकलण्यात आले, याचा तपास केला जात आहे. या कारवाईसाठी किल्ल्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुरुवातीला सिया गोयलने हा अपघात असल्याचे सांगत केतनचा पाय घसरल्याचा दावा केला होता. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक पुरावे, मोबाईल कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या हत्येचा छडा लावला. तपासात समोर आले की, सिया आणि चेतनने अवघ्या 45 मिनिटांत केतनच्या हत्येचा कट रचला होता. 18 जून रोजी सकाळी गडावर पोहोचल्यानंतर पूर्वनियोजित योजनेनुसार, सियाच्या इशाऱ्यावरून चेतनने केतनला मागून खोल दरीत ढकलून दिले होते. आज लोहगड किल्ल्यावरील ज्या कड्यावरून केतनला ढकलण्यात आले, त्याच ठिकाणी दोन्ही आरोपींना समोरासमोर उभे करून चौकशी केली जात आहे. हत्येचा कट कसा अमलात आणला, घटनास्थळी कोण कुठे उभे होते आणि हत्येनंतर त्यांनी काय केले, याबद्दल पोलिसांकडून प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती घेतली जात आहे. या हत्या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस सर्व तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुरावे भक्कमपणे गोळा करत आहेत, जेणेकरून आरोपींना कठोर शिक्षा होईल. एवढा मोठा गुन्हा करूनही कोठडीत सियाला कोणताही पश्चात्ताप नाही गुन्हा घडल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला. आरोपींचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड , मोबाइल लोकेशन आणि त्यांच्या भेटीच्या ठिकाणांची तांत्रिक माहिती काढल्यावर या कटाचा उलगडा झाला आणि दोघांना अटक करण्यात आली. अटकेनंतरही आरोपी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. धक्कादायक बाब म्हणजे, एवढा मोठा गुन्हा करूनही सियाला कोणताही पश्चात्ताप नसून, ती पोलिस कोठडीत रडलीही नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जानेवारीत सिया आणि चेतन उदयपूरला गेले सिया, चेतनच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांनी मित्रमंडळींसह राजस्थानमध्ये पाच ते सहा दिवस फिरण्यासाठी जाण्याचे नियोजन जानेवारीत केले. मूळचा राजस्थानचा रहिवासी असलेल्या चेतन चौधरी याने तिला उदयपूरला नेले. येताना आणि जाताना दोघेही विमानाने गेले असल्याचे तपासात समोर आले आहे. लग्न करण्यासाठी 3 वर्षे थांबण्याचा होता प्लॅन केतनची हत्या केल्यानंतर लगेच लग्न केल्यास पोलिसांना संशय येईल, म्हणून या दोघांनी दोन ते तीन वर्षे थांबून मगच लग्न करण्याचे ठरवले होते. व्हॉट्सॲपवरील कोणते मेसेज डिलीट करायचे आणि कोणते ठेवायचे, याची पूर्ण काळजी सिया आणि चेतनने यांनी आधीच घेतल्याचेही समोर आले सियाच्या कुटुंबीयांची पोलिसांकडून चौकशी या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी सियाचा भाऊ साहिल याची तब्बल दहा तास सखोल चौकशी केली. सियाचे वडील आजारी असल्याने आतापर्यंत त्यांची चौकशी झाली नव्हती. मात्र, शनिवारी पोलिसांनी सियाचे आई-वडील आणि भाऊ यांची एकत्रित चौकशी केली. यावर पोलिस उपअधीक्षक गजानन टोम्पे म्हणाले, “तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात असून आम्ही पुरावे गोळा करण्याचे आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम करत आहोत.’ बाली ट्रिप रद्दसाठी पासपोर्टही फाडला 6 जून रोजी केतन आणि सिया प्री-वेडिंग शूटसाठी बाली (इंडोनेशिया) येथे जाणार होते. तिथे दोघांना एकाच खोलीत राहावे लागणार असल्याने सियाने त्यापूर्वीच हत्येचा कट रचला. मुंबई विमानतळावर जाताना खोपोली फूड मॉलजवळ गाडी थांबली असता, सियाने मोबाइल विसरल्याचा बहाणा करत गाडीत जाऊन केतनचा पासपोर्ट चोरला. वॉशरूममध्ये जाऊन तिने पासपोर्टची चार पाने फाडून फ्लश केली आणि उर्वरित पासपोर्ट कचरापेटीत फेकून दिला. यामुळे केतनला बाली ट्रिप रद्द करून घरी परतावे लागले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
