‘वारी विवेकाची’: मातृतीर्थ सिंदखेडराजा ते लोकतीर्थ पंढरपूर, ज्येष्ठ कवी श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते अभिनव उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण – Nanded News

‘वारी विवेकाची’:  मातृतीर्थ सिंदखेडराजा ते लोकतीर्थ पंढरपूर, ज्येष्ठ कवी श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते अभिनव उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण – Nanded News



“॥ भेदाभेद भ्रम अमंगळ ॥” या संतवचनाचा जागर करत आयोजित करण्यात आलेल्या ‘वारी विवेकाची – मातृतिर्थ सिंदखेडराजा ते लोकतिर्थ पंढरपूर’ या अभिनव उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ साहित्यिक तथा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक श्रीकांत देशमुख यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी प्रा. भगवंत क्षीरसागर, प्रकाश मोगले, प्रा. नारायण शिंदे, प्रा. अनमोलसिंह कामठेकर, प्रा. महेश मोरे, अमृत तेलंग, शिवाजी जोगदंड, मनोहर बसवंते, डॉ. अशोक बनसोड, मुरहरी गायकवाड, प्रा. श्री. जाधव, नंदन नांगरे, सचिन पाटील, डॉ. विजय महाजन आदींसह साहित्य, कला, क्रीडा, प्रशासन, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. पोस्टर अनावरण प्रसंगी बोलताना श्रीकांत देशमुख म्हणाले, “समाजात वाढत चाललेल्या विभाजनवादी प्रवृत्ती, अंधश्रद्धा आणि वैचारिक संभ्रमाच्या काळात संतपरंपरेतील समता, बंधुता आणि विवेकाचा संदेश नव्याने समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. ‘या रे या रे सकळ जन’ हा समावेशक विचार जनमानसात रुजविण्यासाठी अशी वारी काळाची गरज आहे.” संतपरंपरेतील समता, विवेक, मानवता आणि प्रबोधनाच्या मूल्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही वारी शुक्रवार, १० जुलै २०२६ रोजी मातृतिर्थ सिंदखेडराजा येथून प्रारंभ होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीत अभिवादन करून वारीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. ही वारी सिंदखेडराजा, जालना, अंबड, गेवराई, बीड, मांजरसुंबा, चोसळा, कुंथलगिरी, भूम, परांडा, कुर्डुवाडी आणि अरण मार्गे लोकतिर्थ पंढरपूर येथे पोहोचणार आहे. मार्गातील विविध संत, महंत, समाजसुधारक आणि महापुरुषांच्या स्मृतीस्थळांना अभिवादन करत ही वारी पुढे सरकणार आहे. या उपक्रमात साहित्यिक, कलावंत, माजी प्रशासकीय अधिकारी, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, अभ्यासक तसेच वारकरी परंपरेशी नाते असलेली विविध क्षेत्रांतील मंडळी सहभागी होणार आहेत. वारकरी संप्रदायातील भक्ती, समता, बंधुता, सामाजिक प्रबोधन आणि विवेकनिष्ठ विचारांचा जागर करण्यासाठी ही वारी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. वारीदरम्यान मार्गातील गावांमध्ये संवाद, प्रबोधनपर कार्यक्रम, संतवाङ्मय चिंतन, सामाजिक समतेवरील चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भक्ती आणि विवेक यांचा संगम घडवून समाजात सकारात्मक परिवर्तनाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. पोस्टर अनावरण प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत वारकरी परंपरेतील समतेचा आणि विवेकाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. महाराष्ट्राच्या संतपरंपरेच्या वैभवाला आधुनिक सामाजिक प्रबोधनाची जोड देणारी ही ‘वारी विवेकाची’ राज्यभरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. “जिजाऊंच्या मातृतिर्थातून सुरू होऊन विठ्ठलाच्या लोकतिर्थापर्यंत जाणारी ही वारी भक्ती, विवेक, समता आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश घेऊन मार्गस्थ होणार आहे,” असे आयोजकांनी सांगितले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp