
चौंडी येथे मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जामखेड तालुक्याला कुकडी आणि उजनी धरणाचे पाणी देण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली आहे.
.
अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत लोखंडे यांनी ही मागणी केली. तसेच मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही दिले आहे. जामखेड तालुक्यात ऐतिहासिक खर्डा किल्ला आहे. हा तालुका राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असून मराठवाड्याच्या सीमेवर आहे.
लोखंडे यांनी सांगितले की, जामखेड तालुका अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत आहे. शेजारच्या आष्टी तालुक्याला कुकडीचे पाणी मिळते. मात्र जामखेड तालुक्याला पाणी मिळत नाही. आष्टी तालुक्याप्रमाणेच जामखेड तालुक्यालाही पाणी मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.
सभापती राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर खास बाब म्हणून निर्णय घ्यावा, असे लोखंडे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या पत्रात काय?
माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हैदराबादच्या निजामाबरोबर मराठा सरदार दौलतराव शिंदे तुकोजी होळकर व रघुजी भोसले यांच्या संयुक्त फौजांनी खर्डा येथे लढाई केली. त्यात निजामांचा दारुण पराभव झाला. मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा व गौरवशाली इतिहास सांगणारा खर्डा किल्ला जामखेड तालुक्यात आहे. तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे तेथे जन्मस्थानही आहे. परंतु हा तालुका दुष्काळी आहे. खर्डा परिसरातील मोहरी तलावात पाणी सोडल्यास तसेच उजनी धरणाचे पाणी शेजारच्या मराठवाड्यातील भूम तालुक्यात येते. ते पाणी खर्डा जवळील खैरी तलावात आणणे सोयीस्कर आहे, असे झाल्यास जामखेड तालुक्याचा कायम दुष्काळी असणारा भाग ओलिताखाली येईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.