
अयोध्या राम मंदिरातील दानाच्या गडबडीच्या आरोपांवर श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी गंभीर चूक मान्य केली आहे. त्यांनी एका मुलाखतीत म्हटले की, राम मंदिरातील दानावर उघडपणे डल्ला मारण्यात आला. हा भक्तांचा मोठा विश्वासघात आहे. मंदिराची संपूर्ण व्यवस्थापन प्रणाली बदलली पाहिजे आणि ती अनुभवी प्रोफेशनल्सच्या हाती दिली पाहिजे. मिश्रा म्हणाले की, दान सांभाळण्यासाठी आणि मोजण्यासाठी २०२३ ते २०२५ दरम्यान सविस्तर एसओपी (SOP) बनवली गेली होती. जर त्याचे १०% जरी पालन झाले असते, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. मोजणी कक्षात जाणाऱ्या व्यक्तीचे कपडेही निश्चित होते. हे कपडे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून दिले जाणार होते. प्रत्येक एंट्री आणि एक्झिटवर तपासणी होणार होती. बँक आणि ट्रस्टच्या दोन-दोन प्रतिनिधींनी देखरेख करायची होती, पण ही देखरेखदेखील अनौपचारिक राहिली. त्यांनी सांगितले की, मंदिराचे काम सध्या मोठ्या प्रमाणावर व्हॉलंटियर (स्वयंसेवक) सिस्टीमने चालत आहे. लोकांना तोंडी काम सांगितले जाते. लेखी आदेश, निश्चित जबाबदारी आणि कामाची स्पष्ट विभागणी नाही. मंदिर परिसरात सुमारे १,५०० लोक वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतले आहेत. अशा स्थितीत इतक्या मोठ्या संस्थेला व्यावसायिक आणि जबाबदार व्यवस्थेची गरज आहे. ५०० वर्षे वाट पाहिली, १५ दिवस आणखी पाहा : योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी सांगितले की, ट्रस्टच्या विनंतीवरून एसआयटी (SIT) चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीतून संपूर्ण सत्य समोर येईल. ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी ते एसआयटीला द्यावेत. कुणीही दोषी आढळल्यास, त्याचे पद किंवा प्रतिष्ठा पाहिली जाणार नाही. योगी म्हणाले, भगवान रामांनी मर्यादा शिकवली आहे. ५०० वर्षे वाट पाहिली, आणखी १५ दिवस वाट पाहा. अफवा आणि निराधार विधानांमुळे भक्तांच्या भावना दुखावू नका. अयोध्येला बदनाम करण्याच्या प्रयत्नांपासून सावध राहा.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
