
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. जयंत नारळीकर यांच्या रुपाने विज्ञानाच्या कडू गोळीला साखरेचे गोड कोटिंग करणारा माणूस हरवला, असे ते म्हणालेत.
.
विख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांच्या निधनामुळे महाराष्ट्रासह अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्तींनी नारळीकरांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. या सर्वांनी नारळीकरांच्या निधनामुळे देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील एक तेजस्वी तारा निखळल्याची भावना व्यक्त केली आहे.
खाली वाचा राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं आज निधन झालं. १९६४ साली वयाच्या २६ व्या वर्षी एका तरुण मराठी शास्त्रज्ञाने आपले गुरु फ्रेड हॉयल यांच्या सोबत गुरुत्वाकर्षणाचा नवा सिद्धांत मांडला आणि यातून विश्वनिर्मितीच्या रहस्यावरील संशोधनाला चालना मिळाली. त्यावेळेस बिगबँग थिअरी ही प्रचलित आणि सर्वमान्य थिअरी होती पण त्यालाच नारळीकरांनी आवाहन दिलं आणि यातूनच विश्वनिर्मितीच्या बाबत अनेक नव्या शक्यता आज देखील तपासून बघितल्या जात आहेत.
आपण कोण, कुठून आलो, ही सृष्टी कोणी आणि कशी निर्माण केली ? हे माणसाला पडलेले मूलभूत प्रश्न आहेत ज्यावर अनेक शतकं विचार सुरु आहे. सुरुवातीला जेंव्हा कुठलंच सज्जड उत्तर सापडलं नाही तेंव्हा ही सृष्टी कुठल्यातरी शक्तीने घडवली असं मानलं गेलं, आणि हे काही भारतातच नाही तर जगभरात मानलं गेलं. मग या सृष्टीच्या नियंताचा शोध घ्या, त्याचे पृथ्वीवरील स्वघोषित दूत आले आणि त्यातून जगभरात शोषणाची एक लाटच आली होती.
युरोपात रेनिसन्सचा काळ आला आणि ज्यातून सगळ्याच कल्पनांना आवाहन दिलं गेलं. अर्थात त्यासाठी शास्त्रज्ञांना तत्कालीन धर्मसत्ता आणि कधी कधी राजसत्तेकडून प्रचंड अहवेलना सहन करावी लागली. पण त्यांची चिकाटी संपली नाही. आणि म्हणूनच आज जग ज्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उंबरठ्यावर आहे तिथे पोहचु शकला.
डॉ. जयंत नारळीकर आणि त्यांच्या गुरूंनी विज्ञानाच्याच अशा एका कल्पनेला आवाहन दिलं आणि एक नवा सिद्धांत मांडला. विज्ञानात एक बरं असतं की एखाद्याने एखादी थिअरी खोडून काढली म्हणून कोणी कोणाच्या अंगावर धावून जात नाही, उलट नव्या प्रेरणेने त्याचा विचार सुरु होतो. असं राजकारणात कधी होईल कोण जाणे. असो.
पण डॉ नारळीकर हे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ होतेच पण त्यांच्या बाबतीत दोन गोष्टी मला खूपच लक्षणीय वाटतात. एक म्हणजे आयुका सारखी संस्था जिथे खगोलशास्त्र आणि खगोलभौतिक शास्त्रावर मूलभूत संशोधन केलं जातं. डॉ नारळीकर जेंव्हा १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतात परतले तो काळ असा होता जेंव्हा विज्ञानातील मूलभूत संशोधनातील संस्था उभ्या राहत होत्या. स्वतः नारळीकर टाटा मूलभूत संशोधन संस्थेत कार्यरत होते, त्यामुळे कदाचित त्यांना तिथून प्रेरणा मिळाली असावी. आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं आणि त्यांनी तेंव्हा उभ्या केलेल्या संस्था यांचं अप्रुप वाटतं.
डॉ नारळीकरांची दुसरी ओळख म्हणजे ते उत्तम विज्ञान कथा लेखक होते. अमेरिकेत, युरोपात विज्ञानकथांचं आणि त्यातून निघणाऱ्या चित्रपटांचं एक खूप मोठं प्रस्थ आहे. अनेकांना त्याची फारशी गोडी नसते , पण नारळीकरांनी मात्र मराठी जनांना विज्ञानकथेची गोडी लावली. नारळीकर स्वतःच म्हणायचे की ‘विज्ञानाची गोळी कडू लागत असेल तर त्याला साखरेचं कोटिंग म्हणजे कथेचं रूप देणं चांगलं. ‘
विज्ञानाला साखरेचं कोटिंग देणारे सिद्धहस्त लेखक, शास्त्रज्ञ आज आपल्यातून गेले. अशा माणसांची उणीव नक्की भासेल आणि महाराष्ट्राला तर नक्कीच.
डॉ. जयंत नारळीकरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली, असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हे ही वाचा…
ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन:पुण्यातील राहत्या घरी 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; आकाशाशी नाते जडलेला तारा निखळला
पुणे – भारताचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ तथा लेखक डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पहाटे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांना कोणताही आजार नव्हता. त्यांनी झोपेतच शांतपणे अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या निधनामुळे एक थोर वैज्ञानिक, साहित्यिक व शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी तारा मावळल्याची भावना व्यक्त होत आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.