
- Marathi News
- National
- Lucknow Fire Incident, Building Was Ordered To Be Demolished 10 Years Ago; Now It Will Be Demolished After 15 Deaths
लखनऊ21 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
लखनऊमधील अलिगंज येथे १५ जणांचा बळी घेणाऱ्या आगीच्या दुर्घटनेने प्रशासकीय निष्काळजीपणाचे अनेक पदर उघड केले आहेत. या प्रकरणी दाखल एफआयआरमधून धक्कादायक खुलासा झाला असून, ज्या इमारतीला आग लागली तिथे आग विझविण्याच्या मूलभूत सुविधाही नव्हत्या. संपूर्ण इमारतीमध्ये येण्या-जाण्यासाठी केवळ एकच रस्ता होता. आपत्कालीन दरवाजा नव्हता, धूर बाहेर पडण्यासाठी व्यवस्था नव्हती आणि विजेची उपकरणेही असुरक्षित पद्धतीने बसवली होती. परिस्थिती इतकी गंभीर होती की, बचाव पथकाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भिंती तोडाव्या लागल्या.
ज्या इमारतीला २०१४ मध्ये निवासी वापरासाठी मंजुरी मिळाली होती, तिथे पेट शॉप, क्लिनिक, गेमिंग झोन, अॅनिमेशन सेंटर व आयटी ऑफिस सुरू होते. अवैध बांधकामामुळे एलडीएने १० मे २०१६ रोजी ही इमारत पाडण्याचे आदेश दिले, परंतु अवघ्या दोन महिन्यांतच हा आदेश मागे घेण्यात आला. आता १५ लोकांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा ही इमारत पाडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर इमारत मालकासह चोघांना अटक केली आहे. महावितरण, अग्निशामक दल व एलडीएच्या ४ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. एसआयटीने तपास सुरू केला असून ७ दिवसांत अहवाल देणार आहे.
एकत्र काम करायचे, एकत्रच जगाचा निरोप
कानपूरमधील अॅनिमेशन स्टुडिओमध्ये ३डी आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या २ मित्रांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सान्यम विज (२८) आणि सूरजभान सिंह (२४) अशी मृत मित्रांची नावे आहेत. हे दोघे प्रदीर्घ काळापासून एकत्र काम करत होते. आगीत जीव गमावलेले बहुतांश विद्यार्थी व तरुण कर्मचारी होते. कानपूरमध्ये अंत्यसंस्कार झाला.
अग्निशामक यंत्र कधी वापर झाला नाही
अपघाताच्या दुसऱ्या दिवशी इमारतीमधील दृश्य प्रशासकीय निष्काळजीपणाची भीषण कहाणी सांगत होते. संपूर्ण मजला राखेने माखलेला होता, आतमध्ये एक अग्निशामक यंत्र दिसले, ज्याचा बहुदा वापरच केला नव्हता. स्थानिक रहिवासी हेमंत श्रीवास्तव म्हणाले, नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या अशा इमारतीत कधीही मोठी दुर्घटना घडू शकते.
निलेश कुमार व अनामिका सामंत यांच्या लग्नाची तयारी सुरू व होती. काही दिवसांपूर्वीच अनामिकाचे आई-वडिलांनी प. बंगालमधून लखनऊला येऊन नीलेशच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. पुढच्या आठवड्यात नीलेशच्या नातेवाइकांना बंगालला जायचे होते, ट्रेनचे तिकीट बुक झाले होते. दोन्ही कुटुंबे लग्नाची तारीख, विधींवर चर्चा करत होती. मात्र, सोमवाच्या आगीने या दोघांचे आयुष्य संपवले. नीलेशला पदोन्नती आणि पगारवाढ मिळाल्यानंतर पुढच्या वर्षी नव्या घरात लग्न करायचे होते. आता ज्या घरांमध्ये लग्नाची तयारी होणार होती, तिथे अंत्यसंस्काराची तयारी करावी लागत आहे.
फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू
मंगळवारी सकाळी एसआयटीआधी ६ सदस्यांचे फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले. हे पथक आगीची सुरुवात, तिचा झालेला प्रसार आदी अभ्यास करत आहे.
दुसऱ्या मजल्यावर अडकले होते बहुतांश लोक
आगीत सर्वाधिक लोक दुसऱ्या मजल्यावर होते, जिथे अॅनिमेशन सेंटरचे वर्ग सुरू होते. मृतांमध्ये बहुतांश जणांचे वय ३० वर्षांपेक्षा कमी आहे. वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचणे कठीण होते,असे एफआयआरमध्ये आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
