
राजकीय वर्तुळापासून काहीसे दूर असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक आणि माजी मंत्री महादेव जानकर सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना जानकरांनी चक्क एका मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम करून आपल्या साधेपणाची प्रचिती दिली. मोकळ्या माळरानावर, मेंढपाळांसोबत जमिनीवर बसून गप्पा मारत आणि चुलीवरच्या भाकरीचा आस्वाद घेत त्यांनी रात्र काढली. त्यांच्या या अनोख्या मुक्कामाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातील माण तालुक्यातील पांगरी येथे महादेव जानकर यांचा दौरा सुरू होता. यावेळी रासपचे माण तालुका युवक अध्यक्ष तात्याराम दडस यांच्या शेतात मेंढरांचा वाडा आहे. जानकर तेथे पोहोचले असता, त्यांनी एसी रूम किंवा हॉटेल सोडून मेंढपाळांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. “आज मेंढपाळांसोबत या माळरानावर मुक्काम करताना मला माझ्या बालपणाची आठवण झाली. मी पुन्हा एकदा माझ्या त्या संघर्षमय जीवनाचा भाग झालो,” अशा भावना जानकरांनी यावेळी व्यक्त केल्या. मेंढपाळांच्या ‘पाल’वर रात्रीची विश्रांती दिवसभर मतदारसंघातील लोकांशी संवाद साधल्यानंतर रात्री महादेव जानकर यांनी मेंढपाळांसोबतच जेवण केले. तीन दगडांच्या चुलीवर बनवलेली भाकरी आणि पिठलं असा साध्या जेवणाचा त्यांनी आस्वाद घेतला. त्यानंतर उघड्या माळरानावर टाकलेल्या ‘पाल’मध्ये (तात्पुरता तंबू) त्यांनी जमिनीवर झोपून मुक्काम केला. त्यांच्या या कृतीने उपस्थितांसह परिसरातील धनगर समाजात आणि कार्यकर्त्यांमध्ये एक भावनिक नाते निर्माण झाले आहे. राजकीय शांततेनंतर थेट मैदानात गेल्या काही महिन्यांपासून महादेव जानकर सक्रिय राजकारणात फारसे दिसून येत नव्हते. नुकत्याच झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता, मात्र काँग्रेस उमेदवाराने माघार घेतल्याने ते पुन्हा चर्चेत आले होते. आता थेट माढा मतदारसंघाचा दौरा सुरू केल्याने आणि त्यातही असा तळागाळातील लोकांशी संवाद साधल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. हे ही वाचा… राज्यातील मंत्र्यांच्या विमान प्रवासाला ‘ब्रेक’:मुख्यमंत्र्यांची मंजुरी अनिवार्य, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सरकारचा मोठा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधन बचतीसाठी काटकसर करण्याचे आवाहन केल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. आता राज्यातील मंत्र्यांना सरकारी विमानाचा वापर करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेखी मंजुरी घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही मंत्र्याला विमान वापरता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






