
पुणे: ‘इठा’ चित्रपटाच्या टीझरमध्ये तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या मूळ इतिहासाची तोडफोड करून चुकीची माहिती दाखवल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विठाबाईंचे नातू आणि राज्य शासनाच्या ज्येष्ठ कलावंत अनुदान समितीचे सदस्य धनंजय खुडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई आणि अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. या पत्रकार परिषदेला विठाबाई नारायणगावकर यांचे नातेवाईक, तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि तमाशा क्षेत्रातील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वादग्रस्त बाबींचा फेरविचार करण्याची मागणी धनंजय खुडे यांनी सांगितले की, चित्रपट हे एक प्रभावी माध्यम आहे आणि त्यातून सादर होणारी माहिती समाजासाठी इतिहासाचा संदर्भ बनते. त्यामुळे कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा इतिहास काल्पनिक स्वरूपात किंवा वस्तुस्थितीपासून दूर जाऊन सादर होऊ नये, याची काळजी घेणे निर्माते आणि दिग्दर्शकांची नैतिक जबाबदारी आहे. त्यांनी निर्मात्यांनी कुटुंबीयांशी चर्चा करून ऐतिहासिक नोंदींची पडताळणी करावी आणि वादग्रस्त बाबींचा फेरविचार करावा, अशी मागणी केली. चित्रपटात तमाशा मंडळाचा चुकीचा उल्लेख खुडे यांनी चित्रपटातील काही विशिष्ट चुकांवर बोट ठेवले. त्यांनी सांगितले की, तमाशा महर्षी शाहीर पठ्ठे बापूराव यांचे गंडाबंधन शिष्य बापूसाहेब खुडे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात १९३० ते १९३२ दरम्यान ‘भाऊ बापू (मांग) नारायणगावकर तमाशा मंडळ’ स्थापन केले होते. बापूसाहेबांचे चुलते भाऊसाहेब खुडे यांच्यासोबत या जोडीने महाराष्ट्रात तमाशा कलेला मोठे योगदान दिले. मात्र, चित्रपटाच्या टीझरमध्ये या मंडळाचा उल्लेख ‘भाऊ गावकर तमाशा मंडळ’ असा चुकीचा करण्यात आला आहे. मूळ इतिहासाशी छेडछाड सहन केली जाणार नाही याशिवाय, राष्ट्रपती पदक स्वीकारण्याचा दाखवलेला प्रसंगही वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचा आरोप खुडे यांनी केला. त्यांच्या माहितीनुसार, १९६१ साली बापूसाहेब खुडे नारायणगावकर यांना स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले होते. मूळ इतिहासाशी अशी छेडछाड सहन केली जाणार नाही, असे खुडे यांनी स्पष्ट केले. त्यांनी चित्रपटाचे नाव बदलण्याचीही मागणी केली. चित्रपटात आवश्यक बदल न केल्यास कारवाईचा इशारा विठाबाई नारायणगावकर यांच्या चरित्रावर आधारित चित्रपटाची निर्मिती करताना संपूर्ण कुटुंबीयांची संमती घेणे आवश्यक होते. मात्र दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी अशी कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याचा आरोपही धनंजय खुडे यांनी केला. लोककलेच्या परंपरेचा सन्मान राखण्यासाठी आणि भविष्यात कोणताही तमाशा या लोककला संदर्भात समाजात गैरसमज निर्माण होऊ नये, यासाठी चित्रपटात आवश्यक ते बदल करावेत; अन्यथा चित्रपट निर्माते व संबंधितांवर कायदेशीर कारवाई आणि अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल, त्याच बरोबर तीव्र स्वरूपाचे राज्यव्यापी आंदोलन देखील कारण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited
