
छत्रपती संभाजीनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमसैनिकांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. शहरात सर्वत्र ‘जय भीम’चा जयघोष दुमदुमत होता. मिरवणुकीत ‘युद्ध नको बुद्ध हवा’ या आशयाचे फलक लक्षवेधी ठरले. सध्याच्या इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर या शांतीसंदेशाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. गया येथील अतिक्रमण आणि महाडच्या चवदार तळ्याचा देखावा हे देखील मिरवणुकीतील आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. या मिरवणुकीत तरुण आणि महिलांचा मोठा सहभाग होता. जयंतीनिमित्त शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. भाजप, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), सर्वपक्षीय आंबेडकरवादी सार्वजनिक जयंती महोत्सव समिती आणि भाकपसह विविध पक्ष आणि संघटनांनी मोठे बॅनर लावून भव्य स्टेज उभारले होते. भाकपचे अभय टाकसाळ यांनी पुस्तकांचे वाटप केले, तर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी ढोल वाजवून उत्सवात सहभाग घेतला आणि अनेक स्टेजला भेटी दिल्या. क्रांती चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रचंड गर्दी उसळली होती. आकाशवाणी उड्डाणपुलापासून पैठणगेटपर्यंत सर्वत्र जनसमुदाय लोटला होता. मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर सुरू होता, ज्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध देखावे हे देखील मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






