
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघे 2 महिने होत असताना बोगद्यात पाण्याची गळती, रस्त्यांवर तडे आणि दरड कोसळल
.
विधानभवन परिसरात पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनावेळी 240 किमी प्रतितास वेगाच्या वाऱ्यांनाही हा प्रकल्प तोंड देईल, असा दावा केला होता. मात्र पहिल्याच मोठ्या पावसानंतर बोगद्यातून पाण्याचे फवारे उडताना दिसले, रस्त्यांवर तडे गेले आणि दरड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले.
नवयुगा-अॅफकॉनवर कारवाई होणार का?
रोहित पवार यांनी सांगितले की, सुमारे सात हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे कंत्राट नवयुगा आणि अॅफकॉन या कंपन्यांना देण्यात आले. नवयुगा कंपनीचा संबंध यापूर्वी अजित पवारांच्या अपघाताशी संबंधित चर्चेत आलेल्या व्हीएसआर कंपनीशी असल्याचा दावा त्यांनी केला. त्या प्रकरणातही संबंधितांवर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे आता मिसिंग लिंक प्रकल्पातील त्रुटींसाठी या कंपन्यांवर सरकार कारवाई करणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, एवढ्या मोठ्या प्रकल्पात पाण्याची गळती, तडे आणि अन्य तांत्रिक बिघाड दिसत असतील, तर संबंधित कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.
‘ट्रॅफिक संपेल’ म्हणाले, पण आठ-दहा तास कोंडी
रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उद्घाटनावेळच्या भाषणाचाही उल्लेख केला. “उद्घाटनावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते की, आता पुन्हा ट्रॅफिकमध्ये अडकावे लागणार नाही. मात्र, दोन महिन्यांतच या मार्गावर आठ ते दहा तासांची वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे सरकारचे दावे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठी तफावत आहे,” अशी टीका त्यांनी केली.
पावसात मुंबईचे नियोजन कोठे गेले?
मुंबईतील मुसळधार पावसामुळे झाडे कोसळणे, बोगद्यांमध्ये पाणी शिरणे आणि इमारती कोसळण्याच्या घटनांवरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. प्री-मान्सून कामांसाठी दरवर्षी शेकडो कोटी रुपये खर्च केले जातात, मात्र प्रत्यक्षात त्याचा परिणाम दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांच्या मते, मुंबईत प्री-मान्सून देखभालीसाठी होणारा खर्च केवळ कागदावरच दिसतो. जर वेळेत देखभाल झाली असती, तर अनेक दुर्घटना टाळता आल्या असत्या.
मृतांच्या मदतीत भेदभावाचा आरोप
मुंबईतील इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना जाहीर करण्यात आलेल्या मदतीवरूनही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. काही प्रकरणांत वेगवेगळ्या रकमेची मदत जाहीर होत असल्याचे सांगत, मृत व्यक्ती कोणत्याही राज्यातील असली तरी सर्वांना समान मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
‘इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली भ्रष्टाचार’
राज्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शक्तिपीठ महामार्गासह विविध प्रकल्पांच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा दावा करत, या प्रकल्पांचे स्वतंत्र लेखापरीक्षण आणि चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेवरही भूमिका
रोहित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही सरकारवर टीका केली. कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी समितीसोबत चर्चा होणार असून त्यातून तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
तसेच, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने महागाईच्या पार्श्वभूमीवर ‘लाडकी बहीण’ योजनेतील आर्थिक मदत वाढविण्याची शिफारस केल्याचा उल्लेख करत, सरकारने तातडीने त्या शिफारशीची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये जाणार?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चांबाबत विचारले असता रोहित पवार यांनी त्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या. पक्षात किंवा केंद्रातील कोणत्याही नेत्यांसोबत अशा प्रकारची कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आम्ही विरोधी पक्ष म्हणून सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडत राहू,” असे ते म्हणाले.
अयोध्या राम मंदिर प्रकरणावर न्यायालयीन चौकशीची मागणी
राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणावर बोलताना रोहित पवार यांनी केवळ राजीनामे देऊन विषय संपणार नाही, असे म्हटले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. “देशभरातील नागरिकांनी श्रद्धेने दिलेल्या देणगीत गैरव्यवहार झाला असेल, तर त्याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा…
65 वर्षांचा हिशोब द्या, नौटंकी बंद करा:जातनिहाय जनगणनेवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर घणाघात
सध्या देशभरात आणि राज्यात ‘जातनिहाय जनगणने’च्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेससह विरोधकांकडून सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात असतानाच, आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. “काँग्रेसने सलग ६५ वर्षे देशावर राज्य केले, मग तेव्हा त्यांनी जातनिहाय जनगणना का केली नाही? आधी त्या ६५ वर्षांचा हिशोब द्या आणि आता सुरू असलेली नौटंकी बंद करा,” असा घणाघात बावनकुळे यांनी केला आहे. सोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असून भाजपचे सरकारच ही जनगणना करणार असल्याचा मोठा दावाही त्यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
देशात मोदी अन् फडणवीसांचे भिंग फुटले:फडणवीसांनी आम्हाला विकास शिकवू नये, त्यांनी केलेली कामे महिनाभरात कोसळतात- संजय राऊत

भाजप सरकारच्या काळात झालेल्या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून मेट्रोपासून ते लोकल ट्रेन आणि बेस्ट बसपर्यंत सर्वच वाहने गळत आहेत. प्रत्येक कामात आधी कमिशन खाण्याच्या वृत्तीमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. कालच्या एकाच पावसाने या सरकारची पोलखोल केली असून, जनतेचे तब्बल 4,500 कोटी रुपये एका झटक्यात वाहून गेले आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘विकासपुरुष’ नरेंद्र मोदी आणि ‘इन्फ्रामॅन’ देवेंद्र फडणवीस यांचे भिंग आता पूर्णपणे फुटले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. येथे वाचा संपूर्ण बातमी
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
