
राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या तासात छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक खळबळजनक राजकीय घडामोड समोर आली आहे. महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला सुटलेली असून त्यांनी आपला अधिकृत उमेदवारही घोषित केलेला असताना, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ऐनवेळी घडलेल्या या अनपेक्षित प्रकारामुळे आता महायुतीमध्ये शिवसेनेकडून खरोखरच बंडखोरी होणार का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. या मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपने सुहास शिरसाट यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली असतानाच, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपायला अवघा काही वेळ शिल्लक असताना समीर सत्तार यांनी अचानक निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. विशेष बाब म्हणजे, समीर सत्तार स्वतः उपस्थित नसताना त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वर्षानुवर्षे शिवसेनेचा पारंपरिक गड मानला जाणारा छत्रपती संभाजीनगर-जालना हा मतदारसंघ यंदाच्या जागावाटपात भाजपने आपल्या पदरात पाडून घेतल्याने स्थानिक शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती. शिवसेनेची ही हक्काची जागा भाजपला सोडली गेल्याच्या याच पार्श्वभूमीवर, आता थेट आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुत्राने उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. एमआयएमकडूनही अर्ज दाखल या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेसोबतच आता एमआयएम पक्षानेही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, भाजपच्या सुहास शिरसाट यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ जूनपर्यंत असल्याने, आता समीर सत्तार आपला अर्ज मागे घेतात की बंडखोरी कायम ठेवत महायुतीसमोरील आव्हान वाढवतात, हे पाहणे अत्यंत औत्सुक्याचे ठरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
