
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील बोरखडी बुजुर्ग आणि इस्माईलपूर या दोन गावांनी १०० टक्के स्वगणना पूर्ण करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. ही दोन्ही गावे स्वगणना पूर्ण करणारी जिल्ह्यातील पहिली गावे ठरली आहेत. भारत सरकारच्या जनगणना विभागाने महाराष्ट्र दिनापासून (१ मे) स्वगणना सुरू केली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नागरिकांना स्वगणना पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बोरखडी बुजुर्ग आणि इस्माईलपूर येथील सर्व कुटुंबांनी आपली स्वगणना यशस्वीरित्या पूर्ण केली. या गावांचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुटुंबांनी आगामी १५ मे पर्यंत आपली स्वगणना पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा केले आहे. महसूल यंत्रणेच्या माहितीनुसार, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आणि तहसीलदार अक्षय मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले. मंडळ अधिकारी संतोष धुर्वे, गौरव सुरपाटणे, ग्राम महसूल अधिकारी व्ही. बी. बिहाडे, व्ही. बी. दहाट, धम्मपाल वानखडे, महसूल सेवक सीमा वानखडे आणि प्रशांत बिरे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, अमरावती जिल्ह्याने मतदार यादीच्या सूक्ष्म पुनरिक्षण (एसआयआर) कामातही राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्याने राज्यात पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. सध्या जिल्ह्याचे काम ८४ टक्क्यांवर पोहोचले आहे. मोर्शी-वरुड, अमरावती आणि बडनेरा या तीन विधानसभा मतदारसंघांचे काम पुढे गेल्यास जिल्हा सुमारे ९२ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






