
व्यसनांना सामाजिक प्रतिष्ठा मिळणे खेदजनक आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. कोणत्याही कौटुंबिक किंवा सामाजिक समारंभात ‘सोशल ड्रींक’ न करणाऱ्या व्यक्तीकडे आश्चर्यचकित नजरेने पाहणाऱ्या तथाकथित प्रतिष्ठित लोकांनीच व्यसनांना ही सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली आहे, असे तज्ज्ञांनी नमूद केले. तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि समाजात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २६ जून हा दिवस ‘जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन’ म्हणून पाळला जातो. याच निमित्ताने अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन आणि पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राने ‘साधना’ साप्ताहिकाच्या सहयोगाने एका विशेष दीर्घ मुलाखतीचे आयोजन केले होते. या मुलाखतीत गडचिरोली येथील ‘सर्च’ संस्थेचे संचालक डॉ. आनंद बंग, सातारा येथील ‘परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्रा’चे संचालक डॉ. हमीद दाभोलकर आणि महाराष्ट्र राज्य अमली पदार्थ विरोधी कृती दलाचे अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी सहभाग घेतला. मुक्ता पुणतांबेकर आणि सोनाली काळे यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचे सदस्य डॉ. सुरेश तलाठी यांच्या संकल्पनेतून निवारा सभागृहात आयोजित हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला होता. यावेळी बोलताना डॉ. हमीद दाभोलकर यांनी मानसिक आरोग्य आणि व्यसन यांचा जवळचा संबंध असल्याचे सांगितले. मानसिक अस्वस्थता आल्यावर व्यक्ती एकतर धर्माकडे किंवा व्यसनाकडे वळते. हे दोन्ही उपाय तात्पुरता दिलासा देणारे असल्याने ते दीर्घकालीन उपाय नाहीत. व्यसनाधीनता हाच मुळात एक मानसिक प्रश्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्याप्रमाणे अंधश्रद्धा अज्ञानातून निर्माण होते, त्याच पद्धतीने अनेक मानसिक आजार व्यसनाच्या प्रभावाखाली निर्माण होतात. व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देण्यात सेलिब्रिटीही तितकेच जबाबदार आहेत, कारण ते आवश्यकता नसतानाही तंबाखू आणि अल्कोहोलच्या जाहिराती करतात. अंधश्रद्धा आणि व्यसन हे व्यक्तीचा विवेक मारण्याचे काम करतात, ज्यामुळे व्यक्ती चांगले-वाईट यातील फरक करण्याचे भान हरवून बसते, असे डॉ. दाभोलकर म्हणाले. डॉ. आनंद बंग यांनी व्यसन म्हणजे तंबाखू आणि दारू या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. १९८६ साली गडचिरोलीमध्ये स्त्रियांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवून काम सुरू केले, तेव्हा स्त्रियांनी आरोग्याच्या प्रश्नापेक्षा दारूबंदीला अधिक प्राधान्य दिले. दारूमुक्ती हेच त्यांचे मुख्य धोरण होते. तत्कालीन नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा व्यसनाच्याही आहारी गेला होता. कोणताही प्रश्न हिंसेने सुटत नाही, तर त्यासाठी अहिंसेचा मार्ग अवलंबवा लागतो, या सूत्रावर एकत्र येत ‘सर्च’ संस्थेने दारूमुक्तीसाठी सातत्याने लढा दिला. संस्थेमार्फत जिल्हाव्यापी कार्यक्रम आखून शासकीय दारूबंदी लागू करण्यात यश आले, असे डॉ. बंग यांनी नमूद केले. यावेळी बोलताना हिंमत जाधव म्हणाले की, व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी या दोन्ही गोष्टी सोबत प्रवास करतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार अंमली पदार्थ विरोधी कृतीदल स्थापन करून व्यसनाधीनता मूळासकट उखडवून टाकण्याचा निर्धार केलेला आहे. या कृतीदलाचे मुख्यालय पुणे हेच असून त्याच्या अखत्यारीत राज्यात सात उपकेंद्र स्थापन करण्यात आले आहेत. व्यसनाधीनतेचा प्रश्न हा केवळ एका व्यक्तीपुरता नसून नार्को टेररीझम हा त्याचा व्यापक आयाम आहे. पारंपारिक युध्द पध्दती बदलून शत्रू राष्ट्राच्या पिढ्यान् पिढ्या व्यसनाच्या आहारी कशा जातील आणि अंमली पदार्थांच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातूं शत्रू राष्ट्रात देश विघातक कृती कशा करता येतील, यादृष्टीने रणनिती आखली जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
