
मुंबईतील मुसळधार पाऊस, पाणी तुंबणे, प्रशासनावरील टीका आणि मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली. अश्विनी भिडे या कर्तबगार अधिकारी असून एखादी दुर्दैवी घटना घडताच त्यांचा राजीनामा मागणे उचित नसल्याचे दरेकर म्हणाले. तसेच आपत्तीच्या काळात राजकारण करण्याऐवजी त्रुटी दूर करण्यावर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दरेकर यांनी विविध राजकीय आणि प्रशासकीय विषयांवर भाष्य केले. ‘अश्विनी भिडे यांचा ट्रॅक रेकॉर्ड उत्तम’ मुंबईतील दुर्घटनांनंतर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याबाबत विचारले असता दरेकर म्हणाले की, एखादी घटना घडली म्हणून लगेच अश्विनी भिडेंसारख्या कर्तबगार महिला आयुक्तांना पद सोडण्यास सांगणे योग्य नाही. त्यांनी सांगितले की, एमएमआरडीए आणि मेट्रो प्रकल्पांमध्ये अश्विनी भिडे यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. महापालिका आयुक्त म्हणून त्यांना अजून फार काळ झालेला नाही. पुढील काही महिन्यांत आणि पुढील वर्षभरात त्या आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासनात आवश्यक बदल घडवून आणतील, असा विश्वास असल्याचे दरेकर यांनी व्यक्त केले. मुंबईतील पावसावरून विरोधकांवर टीका मुंबईत मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून विरोधकांनी भाजपवर टीका केल्याबाबत दरेकर म्हणाले की, नैसर्गिक आपत्तींचा राजकीय वापर करणे ही योग्य परंपरा नाही. विरोधकांकडे कोणतेही सकारात्मक काम नसल्यामुळे ते केवळ उणिवा शोधून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्रुटी असतील तर त्या निश्चितपणे दुरुस्त केल्या जातील, मात्र अशा प्रसंगांचे राजकारण करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमित साटम प्रकरणावर मुख्यमंत्र्यांवर विश्वास मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अमित साटम प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याबाबत विचारले असता दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्री त्या पत्राचा योग्य प्रकारे विचार करतील आणि काय करायचे याचा निर्णय घेतील. मुख्यमंत्री आवश्यक तेथे संबंधितांना खडसावत असतात. मात्र त्यातील प्रत्येक गोष्ट सार्वजनिकपणे किंवा माध्यमांसमोर येतेच असे नाही, असेही त्यांनी सांगितले. सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीवर भाष्य टाळले भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील पक्ष संघटनेबाबत व्यक्त केलेल्या नाराजीवर दरेकर यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. हा विषय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या स्तरावरील असल्याने त्यावर भाष्य करणे ना आपल्या अधिकारात आहे, ना ते योग्य ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘महायुतीत कोणताही अंतर्गत वाद नाही’ शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये मुंबई महापालिकेच्या मुद्द्यावर मतभेद असल्याच्या चर्चांनाही दरेकर यांनी फेटाळले. एखाद्या घटनेनंतर वेगवेगळी मते व्यक्त होऊ शकतात. मात्र त्याचा अर्थ महायुतीत कुरघोडी किंवा वाद आहेत असा होत नाही, असे ते म्हणाले. मुंबई महापालिका महायुतीच्या माध्यमातून चालवली जात असून नागरिकांच्या हितासाठी जे योग्य असेल त्यासाठी सर्व घटक पक्ष एकत्रितपणे काम करतील आणि त्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारतील, असेही दरेकर यांनी सांगितले. सहकार क्षेत्रातील पुरस्कारांचे कौतुक यावेळी दरेकर यांनी आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त विविध सहकारी संस्था आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आल्याचे सांगितले. यंदा सुमारे १८ ते २० पुरस्कार देण्यात आले असून भविष्यात हरित पर्यावरण, डिजिटायझेशन यांसारख्या क्षेत्रांसाठीही स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे राज्यातील सहकार चळवळीला नवी गती मिळत असून ‘नमो टॅक्सी’, ‘सहकार टॅक्सी’सारखे उपक्रमही पुढे नेले जात असल्याचे दरेकर यांनी नमूद केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
