
पर्यटकांचे हक्काचे ठिकाण आणि पावसाळ्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील प्रसिद्ध ‘भुशी धरण’ आज सकाळी अखेर ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या ४८ तासांत लोणावळा-खंडाळा परिसरात झालेल्या तब्बल २२९ मिमी मुसळधार पावसामुळे धरणाचा सांडवा पूर्णपणे भरून वाहू लागला आहे. शुभ्र फेसाळणारे पाण्याचे प्रवाह पायऱ्यांवरून वाहू लागल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे उधाण आले असून, लोणावळ्यातील वर्षा पर्यटनाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. २४ तासांत ११६ मिमी पाऊस, डोंगर-दऱ्यांमध्ये धबधबे सक्रिय लोणावळ्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून आज शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ११६ मिमी (४.५७ इंच) पावसाची नोंद झाली आहे. तर चालू वर्षातील एकूण पावसाचा आकडा आता ७०२ मिमीवर पोहोचला आहे. या दमदार पावसामुळे घाटमाथ्यावरील डोंगर-दऱ्यांमधील धबधबेही वेगाने प्रवाही झाले असून संपूर्ण परिसर हिरव्यागार चादरीत नटला आहे. पर्यटकांची गर्दी; वीकेंडला गर्दीची शक्यता धरण ओव्हरफ्लो झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच आज सकाळपासूनच भुशी धरण, सहारा पूल धबधबा आणि परिसरातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यात पर्यटकांनी मनमुराद भिजण्याचा आनंद लुटला. शनिवार आणि रविवारच्या सुट्या जोडून येत असल्याने मुंबई, पुणे आणि राज्यातील विविध भागांतून लाखो पर्यटक लोणावळ्याकडे येण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिक, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रशासनाकडून सुरक्षेचे कडक आवाहन भुशी धरणावर पर्यटकांचा उत्साह ओसंडून वाहत असला, तरी प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने कडक सूचना जारी केल्या आहेत. वाहत्या पाण्यात खोलवर जाणे, धोकादायक कड्यांवर किंवा धबधब्यांच्या ठिकाणी सेल्फी काढणे आणि हुल्लडबाजी करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाचा जोर पाहता पर्यटकांनी खबरदारी बाळगूनच निसर्गाचा आनंद घ्यावा, असे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हेही वाचा.. राज्यात मान्सूनची दमदार बॅटिंग:पुणे-रायगडला ‘रेड’ तर मुंबईला ‘ऑरेंज’ अलर्ट; सांताक्रूझमध्ये झाड कोसळून 8 मजूर जखमी अरबी समुद्रात तब्बल १५ दिवस रेंगाळल्यानंतर मान्सूनने आता संपूर्ण राज्यात दमदार हजेरी लावली आहे. रखडलेल्या पेरण्यांना वेग आल्याने बळीराजा सुखावला आहे. तरी मुंबई आणि उपनगरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने रायगड आणि पुण्याला ‘रेड अलर्ट’ तर मुंबई, ठाणे आणि पालघरला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांना अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
