
अंजनगाव बारी परिसरातील कांदा आणि केळी उत्पादक शेतकरी मे महिन्यात झालेल्या वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. पंचनामे पूर्ण होऊन दोन महिने उलटले असले तरी, अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी उत्पादक शेतकरी निखिल श्रीकृष्ण भोपळे यांच्या दोन एकरांतील सुमारे १,८०० केळीची खोडे जमीनदोस्त झाली. यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, पुढील हंगामासाठी भांडवल उभे करणे त्यांना कठीण झाले आहे. तसेच, परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला असून, त्यांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. प्रलंबित ठिबक सिंचन अनुदान, पीककर्जाचा वाढता बोजा आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे हे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. केळी उत्पादक निखिल भोपळे यांनी सांगितले की, “वादळात आमच्या केळी बागेचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे होऊन दोन महिने झाले, तरी अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. कर्जाचा ताण वाढत असून, शासनाने तातडीने आर्थिक मदत आणि प्रलंबित अनुदान द्यावे, अन्यथा पुढील हंगाम उभा करणे कठीण होईल.” या पार्श्वभूमीवर, केळी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानभरपाई, प्रलंबित अनुदान आणि विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. कांदा उत्पादक शेतकरी रोशन न्यायखोरे म्हणाले, “अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दोन महिने उलटले तरी नुकसानभरपाई मिळालेली नाही. शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करून ती संबंधित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली पाहिजे.”
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
