
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील महिला प्राचार्य संघटनेने नीट, टीईटी आणि यूजीसी-नेट परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भात संघटनेने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन सादर करून कठोर कारवाईची मागणी केली. संघटनेने म्हटले आहे की, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय होत असून, परीक्षा व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होत आहे. शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हताही यामुळे डळमळीत झाली आहे. वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. गुणवत्तेत मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) वरील त्यांचा विश्वास उडाला आहे. अनेक विद्यार्थी सध्या मानसिक नैराश्याचा सामना करत आहेत. या सर्व प्रकरणांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच, परीक्षा प्रक्रियेत अत्याधुनिक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, असे निवेदनात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि गुणवत्ता आधारित शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम राखण्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी विनंतीही महिला प्राचार्य संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना केली. यावेळी संघटनेच्या अध्यक्ष डॉ. संयोगिता देशमुख, उपाध्यक्ष डॉ. आराधना वैद्य व डॉ. वर्षा देशमुख, सचिव डॉ. वनिता काळे, कोषाध्यक्ष डॉ. अंजली ठाकरे, सहसचिव डॉ. माधुरी फुले तसेच कार्यकारिणी सदस्य डॉ. शोभा रोकडे, डॉ. सुचिता खोडके आणि विविध महाविद्यालयाच्या महिला प्राचार्य उपस्थित होत्या.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/