
राज्य राखीव पोलिस दलातील (एसआरपीएफ) महिलांची रखडलेली भरती नेमकी कधी होणार, असा प्रश्न विद्यार्थी समन्वय समितीने राज्य सरकारला विचारला आहे. आगामी पोलिस भरतीमध्ये महिलांना एसआरपीएफमध्ये सामावून घेण्याची मागणीही समितीने केली आहे. राज्य सरकारने 7 जुलै 2020 रोजी एसआरपीएफमध्ये महिलांचा स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. या गटाला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती. नागपूरमधील काटोल येथे राज्यातील पहिली महिला बटालियन स्थापन करण्याचे नियोजन होते. त्यासाठी 1,384 पदांची निर्मिती करण्याबाबत शिफारस करण्यात आली होती. सन 2021 मधील पोलिस भरतीच्या पहिल्या टप्प्यात 461 पदे भरली जातील आणि त्यानंतर एकूण तीन टप्प्यांत प्रक्रिया राबविली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, सहा वर्षे उलटूनही महिला पोलिसांची भरती झालेली नसल्याचा आरोप समितीने केला आहे. महाराष्ट्राने देशात सर्वप्रथम महिलांना पोलिस अधिकारी आणि कर्मचारी म्हणून संधी दिली. केंद्रीय राखीव पोलिस दलातही अनेक वर्षांपासून महिलांची भरती होत आहे. मात्र, राज्याच्या एसआरपीएफमध्ये अद्याप महिलांना संधी मिळालेली नाही, असे समितीचे म्हणणे आहे. विधिमंडळाच्या 2023 आणि 2025 मधील अधिवेशनांत या विषयावर चर्चा होऊन मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. तरीही प्रत्यक्ष भरती झालेली नाही. लवकरच नवी पोलिस भरती सुरू होण्याची शक्यता असल्याने महिला उमेदवारांसाठी शारीरिक व शैक्षणिक पात्रता आणि अभ्यासक्रम तातडीने जाहीर करावा, अशी मागणी समितीचे विठ्ठल बडे यांनी केली आहे. गृह विभाग आणि पोलिस महासंचालक कार्यालयाशी पत्रव्यवहार करूनही ठोस उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.