
आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी आदिवासी क्षेत्रातील आरोग्य, पोषण, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या प्रभावी अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. चिखलदरा येथील आरोग्य विभागाच्या तालुका प्रशिक्षण केंद्रात आयोजित विविध विभागांच्या चिंतन बैठकीत (आढावा सभा) ते बोलत होते. या बैठकीत मंत्री उईके यांनी प्रत्येक विभागाचा सविस्तर आढावा घेतला. प्रारंभी विविध विभागांच्या प्रमुखांनी आपापल्या योजनांची माहिती सादर केली. आदिवासींना शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी बलस्थाने आणि उणीवा ओळखून नेमके काय हवे, यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मंत्री उईके यांनी सरकारी आणि निमसरकारी विभागांतील अधिकाऱ्यांनी स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय वाढवून कामकाजाला गती देण्यास सांगितले. तसेच, स्थानिक समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. या चिंतन बैठकीत आदिवासी भागातील समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत सर्व विभागांकडून आढावा घेतल्यानंतर संयुक्त चर्चाही करण्यात आली. बैठकीला आमदार केवलराम काळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रभुदास भिलावेकर, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, प्रकल्प संचालक सिद्धार्थ शुक्ला, आरोग्य उपसंचालक डॉ. सुशीलकुमार वाकचौरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, धारणीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तिलोत्तमा वानखडे, चिखलदऱ्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र नाडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.