
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी नागपूर येथे रामरक्षा आंदोलन केले. अयोध्येतील राम मंदिर आणि इतर तीर्थस्थळांवरील कथित भ्रष्टाचार आणि चोरीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे पडसाद अमरावतीतही उमटले, जिथे भाजपने राजकमल चौकात सुंदरकांडचे पठण केले, तर माजी खासदार नवनीत राणा यांनी हनुमानगढी येथे हनुमान चालीसा पठण केले. भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करत टीका केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची विचारधारा सोडून सत्तेसाठी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाणाऱ्यांशी हातमिळवणी केल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले. ठाकरेंना सन्मती आणि सद्बुद्धी मिळावी, यासाठी हे सुंदरकांड आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी माजी खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वाखाली हनुमानगढी येथे हनुमान चालीसा पठण करण्यात आले. या पठणात नवनीत राणा यांच्यासोबत अनेक महिलाही सहभागी झाल्या होत्या, ज्यामुळे हनुमानगढी परिसर हनुमान चालीसाच्या जयघोषाने दुमदुमून गेला. युवा स्वाभिमान पार्टीचे आमदार रवी राणा आणि दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केला. सत्तेत असताना ठाकरे सरकारने आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांना मुंबईत हनुमान चालीसा पठण केल्याबद्दल तुरुंगात टाकले होते. त्यावेळी त्यांना हनुमान चालीसा नको होता, मग आता ते स्वतः रामरक्षा आंदोलनासोबत चालीसा का म्हणत आहेत, असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला. देवभक्तीला आपला विरोध नसून, त्यावेळी ठाकरे चुकले असतील आणि आता त्यांना सद्बुद्धी सुचली असेल, असेही त्या म्हणाल्या. मात्र, त्यांचे हे आंदोलन बेगडी असून त्यांची दुटप्पी भूमिका जनतेसमोर आणण्यासाठी हनुमानगढीवर हनुमान चालीसा पठण केल्याचे राणा यांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
