
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी शहरात भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमांतर्गत शहरातील बीओटी मार्केट आणि स्व. हरिभाऊ रामकृष्ण बारी आयटीआय परिसरामध्ये एकूण १११ विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक अतिश झाल्टे, रवींद्र झाल्टे, राहुल चव्हाण व कर्ण बारी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच भारत पेट्रोलियमचे प्रादेशिक प्रबंधक तुषार जगताप, भारत पेट्रोलियमचे जळगाव येथील सेल्स ऑफिसर कन्हैया लाल, सुशीला गॅसचे संचालक राहुल ललवाणी यांच्यासह केशव किरण संस्थेचे सर्व सदस्य आणि गॅस एजन्सीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. दिवसेंदिवस वातावरणात मोठे बदल होत असून, तापमान वाढीचे संकट उभे राहिले आहे. अशा वेळी येणाऱ्या काळात निसर्गाचा समतोल राखायचा असेल, तर केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे जतन व संगोपन करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली. या परिसरातील लावलेल्या सर्व १११ झाडांच्या संगोपनाची जबाबदारी संस्थेच्या वतीने घेण्यात आली आहे.येथील सुशीला गॅस एजन्सी आणि केशव किरण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. या वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा संकल्पही केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
