
राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ चा पात्र शेतकऱ्यांनी मुदतीत लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती यावेळी दिली. या योजनेत तीन प्रमुख घटकांचा समावेश आहे. पहिल्या घटकांतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची कर्जमाफी करण्यात येणार आहे. दुसऱ्या घटकांत एकरकमी समझोता योजना असून, दोन लाख रुपयांवरील थकबाकीची रक्कम शेतकऱ्यांनी बँकेत भरल्यानंतर दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासनाकडून माफ केली जाईल. तिसऱ्या घटकांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या पीक कर्जाचा समावेश आहे. तसेच, ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत न फेडलेली पात्र कर्जे कर्जमाफीसाठी विचारात घेतली जातील. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील रक्कम निर्धारित मुदतीत बँकेत जमा करणे आवश्यक आहे. राज्य सहकार विभागाने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका आणि संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांची यादी पारदर्शक पद्धतीने तयार करण्यात येणार असून, तक्रार निवारणासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध राहील. योजनेचा लाभ कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/