
हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात मोफत रुग्णांचे दररोज केवळ दोन ते तीनच एमआरआय होत असतांना खाजगी रुग्णालयातून आलेल्या १५ ते १६ रुग्णांचे एमआरआय कसे होतात असा सवाल उपस्थित करण्यात आला असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते निनाजी कांडेलकर यांनी केली आहे. हिंगोली येथे एमआरआय नसल्यामुळे रुग्णांना नांदेड किंवा छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागत होते. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे रुग्णालयात एमआरआय सुरु करावा अशी मागणी केली जात होती. त्यानंतर नागरीकांच्या पाठपुराव्यानंतर शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात एमआरआय सुरु करण्यात आला. त्यासाठी सुमारे सात कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून एमआरआय सेंटर चालविण्यासाठी खाजगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात एमआरआय सुरु झाल्यानंतर शासकिय रुग्णालयात आलेल्या रुग्णांना मोठा फायदा होईल असे बोलले जात होते. मात्र मागील काही दिवसांतील एमआरआय लक्षात घेता शासकिय रुग्णालयातील केवळ दोन ते तीनच रुग्णांचे एमआरआय होत असून खाजगी रुग्णालयांनी पाठविलेल्या १५ ते १६ रुग्णांचे एमआरआय दररोज केले जात आहे. विशेष म्हणजे शासकिय रुग्णालयातील रुग्णांचे एमआरआय मोफत असल्यामुळे त्यांनी नंबर लाऊन देखील त्यांचा वेळेत एमआरआय केला जात नाही. या उलट खाजगी रुग्णालयातून आलेल्या रुग्णांकडून आवश्यक शुल्क घेऊन त्यांचे तातडीने एमआरआय केले जात असल्याचा आरोप कांडेलकर यांनी केला आहे. यामुळे शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात कोट्यावधी रुपये खर्चुन उभारलेली यंत्रणा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील रुग्णांसाठी कुचकामी ठरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करावी तसेच दोषींवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/