
गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या खाण प्रकल्पावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गडचिरोलीतील काही भागांमध्ये आपल्या जवळच्या उद्योगपतींना लाभ मिळावा यासाठी खाणकाम प्रकल्पांना परवानगी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे हा प्रकल्प संरक्षित वाघ मार्गिकेच्या परिसरात येत असल्याचा दावा करत त्यांनी हा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकार आणि वन विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, मागील महिन्यात लोहा डोंगरी परिसरात खाणकाम सुरू करण्याच्या हालचाली झाल्या होत्या. गडचिरोलीतील हेद्री आणि आसपासच्या गावांमध्येही अशाच प्रकारचे प्रकल्प प्रस्तावित असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. या भागाचा समावेश संरक्षित वाघ मार्गिकेत होत असल्याचा दावा करत त्यांनी या परिसराला अधिकृत टायगर कॉरिडॉर म्हणून घोषित करण्याची मागणी केली. ताडोबा आणि इंद्रावती या दोन महत्त्वाच्या व्याघ्र क्षेत्रांना जोडणारा हा पट्टा असल्यामुळे येथे कोणत्याही प्रकारचे खाणकाम पर्यावरणासाठी घातक ठरेल, असे ते म्हणाले. वन विभागाच्या निर्णय प्रक्रियेवरही आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते, 28 एप्रिल 2026 रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे ही जमीन खाणकामासाठी देता येईल का, याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर 13 मे 2026 रोजी वन विभागाकडून ही जागा वन्यजीव मार्गिका नसल्याचा अहवाल सादर करण्यात आला. अवघ्या एका महिन्यात दोन वेगवेगळ्या भूमिका कशा घेतल्या गेल्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यामागे दबाव असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला. या प्रकरणात केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहिल्याची माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच अशा प्रकारच्या प्रकल्पांना मंजुरी देताना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील वाघ पाहण्यासाठी पर्यटक ताडोबाला येतात, मात्र अशा महत्त्वाच्या मार्गिकांमध्ये खाणकामाला परवानगी दिल्यास वन्यजीवांच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले. वन्यजीवांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर ठाकरे गटाचा विरोध कायम पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी इतर राजकीय मुद्द्यांवरही भाष्य केले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. कोण आंदोलनात सहभागी होणार हा मुद्दा नसून सरकार विरोधकांच्या आंदोलनाला घाबरत आहे का, हा खरा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी सरकारने लोकशाही मार्गाने आंदोलने होऊ द्यावीत, अशी मागणी केली. गडचिरोलीतील खाण प्रकल्प, पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीवांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचा विरोध कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
