
लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक होण्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो, मात्र कल्याणमध्ये याच्या अगदी उलट असा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे चक्क दोन महिलांनी संगनमत करून एका नामांकित व्यावसायिकाला लग्नाच्या जाळ्यात ओढले आणि त्याची तब्बल 55 लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केली. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत महात्मा फुले चौक पोलिसांनी धडक कारवाई करत या दोन्ही आरोपी महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण पश्चिमेतील एका नामांकित व्यावसायिकाची जयश्री पाटील या महिलेने मुंबईत राहणाऱ्या रोमा परदेशी हिच्याशी ओळख करून दिली होती. रोमा एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीत कामाला असल्याचे भासवून तिने सुरुवातीला या व्यावसायिकासोबत जवळीक वाढवली. त्यानंतर इन्शुरन्स पॉलिसीच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन करून तिने त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी काढण्यात आलीच नाही. या आर्थिक फसवणुकीनंतर काही दिवसांनी, रोमा हिने जयश्री पाटीलच्या माध्यमातून या व्यावसायिकासोबत लग्न करण्याची तयारी दर्शवली. लग्नाला होकार मिळाल्याचा फायदा घेत, या दोन्ही महिलांनी संगनमत करून वेळोवेळी विविध खोटी कारणे सांगत व्यावसायिकाकडून आणखी पैसे उकळण्यास सुरुवात केली. तक्रारदार व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार, इन्शुरन्स आणि लग्नाचे आमिष दाखवून या दोन्ही महिलांनी आतापर्यंत त्यांची तब्बल 55 लाख रुपयांची मोठी फसवणूक केली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या व्यावसायिकाने तत्काळ महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला मुख्य आरोपी रोमा परदेशी हिला अटक केली होती, मात्र तिची नंतर जामिनावर सुटका झाली. या गुन्ह्याचा सखोल तपास करत असतानाच पोलिसांनी नुकतीच तिची साथीदार जयश्री पाटील हिलाही कोल्हापूरमधून बेड्या ठोकल्या आहेत. लग्नाचे आमिष दाखवून माझी मोठी फसवणूक करण्यात आली असून, आरोपींकडून माझे सर्व पैसे वसूल करून मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आता या तक्रारदार व्यावसायिकाने पोलिसांकडे केली असून महात्मा फुले पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
