
परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सईदखान यांचा विजय झाला असला तरी हिंगोलीच्या मतदानावरच त्यांना विजय मिळविता आला आहे. हिंगोली जिल्ह्यातून १३२ पैकी तब्बल ११८ मतदान सईदखान यांना मिळाली. त्यासाठी शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी घेतलेले परिश्रम फाळाला आल्याचे बोलले जात आहे. परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुक सुरवातीपासूनच चर्चेचा विषय बनली होती. या मतदार संघात राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अधिक असल्याने हि जागा राष्ट्रवादीला सोडावी अशी मागणी आमदार राजेश नवघरे यांनी केली होती. मात्र हि जागा शिवसेनेची असल्याने जागा शिवसेनेकडेच राहणार हे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर शिंदेसेनेकडून माजी आमदार विप्लव बाजोरीया यांनी उमेदवारीसाठी वरिष्ठ पातळीवरून फिल्डींग लावली होती. तर अभिमन्यू खोतकर यांनीही उमेदवारी मागितली दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळेल अशी गणिते मांडली जात असतांना ऐनवेळी शिंदेसेनेचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईदखान यांना उमेदवारी देण्यात आली. देशमुखांच्या उमेदवारीमुळे मतविभाजनाची भीती दरम्यान, परभणी-हिंगोली जिल्ह्यात महायुतीचे पारडे जड होते. मात्र ठाकरे गटाकडून डॉ. विवेक नावंदर व अपक्ष म्हणून सुनील देशमुख यांची उमेदवारी असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. त्यातच महायुतीकडे ३४९ मतदान तर महाविकास आघाडीकडे १०२ मतदान होते. त्यामुळे सईदखान यांचा विजय सोपा असल्याचे बोलले जात होते. मात्र देशमुखांच्या उमेदवारी मुळे मतविभाजन होणार हे स्पष्ट झाले होते. आमदार बांगर यांची दक्षता दरम्यान, तीनही उमेदवारी परभणी जिल्ह्यातील असल्याने त्या ठिकाणी दगाफटका होईल अशी भीती व्यक्त होत असल्याने हिंगोली जिल्हयातील १३२ मतदारांकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. त्यासाठी शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी महायुतीचे आमदार राजेश नवघरे, आमदार तान्हाजी मुटकुळे यांची मोट बांधून क्रॉस मतदान होणार नाही याची दक्षता घेतली. मतदानाच्या दिवशीही आमदार बांगर यांनी मतदारांना सोबत घेऊन एकगठ्ठा मतदान करून घेतले. दरम्यान, या निवडणुकीत एकूण ४६५ मतदान झाले. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातून १३२ मतदानापैकी ११८ मतदान सईदखान यांना मिळाले तर परभणी जिल्हयात ३३४ पैकी १२४ मतदान सईदखान यांना मिळाले. मतदानाची आकडेवारी लक्षात घेता हिंगोलीच्या मतांवरच सईदखान यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणुकीत एकूण मतदान या निवडणुकीत ४६५ मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये सईदखान यांना २४२, ठाकरे गटाचे डॉ. नावंदर यांना १५९ तर अपक्ष सुनील देशमुख यांना ५६ मतदान मिळाले आहे. परभणी जिल्हयात महायुतीचे मतदान फुटल्याचेही स्पष्ट होत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
