
पारंपरिक पिकांचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करमाळा तालुक्यात एका तरुण शेतकऱ्याने धाडसी आणि नाविन्यपूर्ण प्रयोग केला. सततचे पाण्याचे संकट, मजुरांची टंचाई आणि बाजारातील चढ-उतार यामुळे ऊस आणि केळीची शेती धोक्यात येत असताना, वडगाव उत्तर येथील सागर थोरवे या युवा प्रगतिशील शेतकऱ्याने कढीपत्त्याच्या शेतीचा एक नवा आणि यशस्वी पॅटर्न तयार केला. कधीकाळी केवळ आंध्र प्रदेशात प्रामुख्याने दिसणारी ही शेती सागरने आपल्या कष्टाच्या आणि योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर करमाळा तालुक्यातील मातीत यशस्वीपणे फुलवून दाखवली. गेल्या 5 ते 7 वर्षांपासून ते कढीपत्त्याच्या पिकातून दरवर्षी तब्बल १५ लाख रुपयांचे स्थिर आणि विक्रमी उत्पन्न घेत आहेत. सागर थोरवे यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रावर पारंपरिक पिकांना फाटा देत कढीपत्त्याची लागवड केली. लागवडीसाठी त्यांनी साडेचार ते पाच फूट अंतरावर सऱ्या काढून बियांची अचूक पेरणी केली. कढीपत्ता हे पीक अत्यंत कमी खर्चात आणि एकदा लागवड केल्यावर दीर्घकाळ (तब्बल 10 वर्षे) उत्पन्न देणारे ठरते, असा विश्वास त्यांनी इतर शेतकऱ्यांना दिला आहे. योग्य सिंचन आणि खत व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांना एका एकरातून वर्षाला सुमारे 15 टन दर्जेदार उत्पादन मिळते. ऊस आणि केळीच्या तुलनेत या पिकाला पाणी आणि कष्ट दोन्ही कमी लागतात, ज्यामुळे मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचतो. शेतकऱ्याचा हा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी आता परिसरातून अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेट देत आहेत. बदलत्या हवामानात कमी खर्चाची आणि शाश्वत उत्पन्न देणारी ही कढीपत्ता शेती दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच एक आशेचा नवा किरण ठरत आहे. याबाबत बोलताना थोरवे म्हणाले की, ‘पारंपरिक ऊस आणि केळीच्या शेतीमध्ये दरवर्षी लागवडीचा आणि मजुरीचा मोठा खर्च होतो. त्याऐवजी कढीपत्त्यासारख्या पिकाचा अवलंब केल्यास केवळ एकदाच खर्च करावा लागतो आणि पुढील 10 वर्षे खात्रीशीर उत्पन्न मिळते.’ खर्च-उत्पन्नाचे गणित असे कढीपत्त्याच्या लागवडीसाठी प्रति एकर 60 किलो बियाणे लागते, तर सुरुवातीला लागवडीचा एकूण खर्च सुमारे 50 हजार रुपये येतो. लागवडीनंतर अवघ्या 7 महिन्यांनी पहिली आणि त्यानंतर दर 4 महिन्यांनी नियमित काढणी करता येते. प्रत्येक काढणीला 7 टन याप्रमाणे प्रति एकर वार्षिक 15 टन उत्पादन मिळते. सध्या पुणे, मुंबई, इंदूरसह प्रमुख बाजारपेठांमध्ये कढीपत्त्याला सुमारे 35 हजार रुपये प्रतिटन असा चांगला दर मिळत आहे. यानुसार, एकरी 5 लाख 25 हजारांचे वार्षिक उत्पन्न मिळते. खर्च वजा करता शेतकऱ्याला दरवर्षी निव्वळ पाच लाखांचा बंपर नफा होतो. (संपर्क: प्रगतिशील शेतकरी सागर थोरवे मोबाइल क्रमांक – 8999073586)
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
