केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार: ‘ऑपरेशन टायगर’मुळे शिंदेंची ताकद वाढली; श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट, तर राष्ट्रवादीलाही मंत्रिपदाची चर्चा – Mumbai News

केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार:  ‘ऑपरेशन टायगर’मुळे शिंदेंची ताकद वाढली; श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट, तर राष्ट्रवादीलाही मंत्रिपदाची चर्चा – Mumbai News



‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करत उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांना आपल्या गोटात खेचणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची दिल्ली दरबारात ताकद चांगलीच वाढली आहे. लोकसभेतील वाढलेले संख्याबळ लक्षात घेता येत्या 28 किंवा 29 जून रोजी होणाऱ्या संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला अतिरिक्त मंत्रिपदे मिळण्याची दाट शक्यता आहे. यात खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी आघाडीवर असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही या फेरबदलात कॅबिनेटमध्ये सामावून घेतले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेला 3 मंत्रिपदे; श्रीकांत शिंदे कॅबिनेटमध्ये? सध्या केंद्रात शिवसेनेचा एकच मंत्री (प्रतापराव जाधव) आहे. मात्र, ‘ऑपरेशन टायगर’नंतर वाढलेल्या बळामुळे शिवसेनेला आता एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री अशी एकूण तीन मंत्रिपदे मिळण्याची चर्चा सुरू आहे. 2024 मध्ये एनडीए सरकार स्थापन होताना शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर होती, मात्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ती नाकारली होती. आता बदललेल्या परिस्थितीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहाखातर ते हे पद स्वीकारतील, अशी दाट चर्चा आहे. विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांच्याकडील ‘आरोग्य राज्यमंत्रिपद’ काढून घेऊन ते शिवसेनेच्याच नव्या खासदाराला दिले जाऊ शकते. मात्र, त्यांचा ‘आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार’ कायम राहील, असेही सूत्रांकडून समजते. दरम्यान, राज्यमंत्रिपदासाठी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव चर्चेत आहे. ‘त्या’ शिवीगाळीमुळे संजय दिना पाटलांची संधी हुकली! उबाठा गटातून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचेही नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र, मुंबईत पत्रकारांना केलेली जाहीर अश्लील शिवीगाळ आणि ‘बॉम्ब’ टाकून मारण्याच्या धमकीमुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. हायकमांड त्यांच्या या मुजोर वर्तनामुळे प्रचंड नाराज असून, त्यामुळे त्यांची मंत्रिपदाची संधी हुकल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचा ‘कॅबिनेट’चा तिढा सुटणार! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने यापूर्वी कॅबिनेट पद भूषवले असल्याने, राष्ट्रवादीने ‘कॅबिनेट’चा आग्रह धरत ती ऑफर नाकारली होती. आता या विस्तारात राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रिपद दिले जाण्याची चिन्हे असून, यासाठी प्रफुल्ल पटेल यांचे नाव निश्चित मानले जात आहे. काही कारणास्तव तसे न झाल्यास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना संधी मिळू शकते. भाजपमधील फेरबदल आणि ‘एक व्यक्ती-एक पद’ भाजपच्या गोटातही मोठ्या खांदेपालटाची तयारी सुरू आहे. जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा: अल्पसंख्याक कार्य आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांचा राज्यसभा कार्यकाळ 21 जून रोजी संपल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. रवनीत सिंह बिट्टू पंजाबमध्ये सक्रिय होणार: बिट्टू यांचाही राज्यसभा कार्यकाळ संपला आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय भूमिका दिली जाऊ शकते. ‘एक व्यक्ती-एक पद’ सूत्र: हर्ष मल्होत्रा (दिल्ली भाजप अध्यक्ष) आणि पंकज चौधरी (उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष) यांच्याकडे मंत्रिपदासोबतच संघटनात्मक जबाबदारी आहे. या सूत्रानुसार त्यांना मंत्रिपद सोडावे लागू शकते. फेरबदलामागील 3 मोठी राजकीय समीकरणे गेल्या अवघ्या तीन महिन्यांत तब्बल 33 विरोधी खासदारांनी एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षांतर करून आलेल्या नेत्यांना सरकारमध्ये सामावून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आम आदमी पक्ष (AAP): 24 एप्रिल रोजी राघव चड्ढा यांच्यासह ‘आप’च्या 7 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तृणमूल काँग्रेस (TMC): 15 जून रोजी टीएमसीच्या 28 पैकी 20 खासदारांनी त्रिपुराच्या नॅशनलिस्ट सिटिजन्स पार्टीमध्ये (NCPI) विलीनीकरण करून एनडीएला पाठिंबा दिला. शिवसेना (UBT): 22 जून रोजी उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले. दोन-तृतीयांश बहुमताचे लक्ष्य भविष्यातील काही महत्त्वाच्या घटनात्मक दुरुस्त्यांसाठी संसदेत दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता असल्याने, नवीन सहयोगी आणि समर्थक खासदारांना खूश ठेवणे भाजपसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. तसेच, आगामी पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक व सामाजिक समीकरणांचा समतोल साधला जाईल.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp